मुंबई बहुजननामा ऑनलाईन – आरोग्याचे शिक्षण देणाऱ्या आणि धोरणे ठरविणाऱ्या बहुतांश संस्था या शहरांमध्ये केंद्रित झाल्या आहेत. परिणामी, दुर्गम भागांकडे आजही डॉक्टर जायला तयार नाहीत. यामुळे ग्रामीण भागातील लोकांना आजही अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्या दूर करायच्या असतील प्रात्यक्षिकावर आधारित वैद्यकीय शिक्षणावर भर दिल्याशिवाय या समस्या दूर होणार नाहीत.त्या दूर करायच्या असतील आदिवासींच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या आणि योजना राबविणाऱ्या सार्वजनिक आरोग्य शिक्षणाच्या संस्थांची मोट बांधावी लागेल,’ असा सूर मेडिकलच्या सामाजिक वैद्यकशास्त्र विभागातर्फे आयोजित प्रकट मुलाखतीतून उमटला.
डॉक्टर्स डेनिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘सर्च’चे संस्थापक डॉ. अभय बंग, बैरागड येथील पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे, मेळघाट येथील महानचे डॉ. आशिष सातव यांची एकाच व्यासपीठावर संयुक्त प्रकट मुलाखत घेण्यात आली. यावेळी डॉ. बी. जी. सुभेदार, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, डॉ. तेजस्विनी ठोसर, माजी अधिष्ठाता डॉ. एस. डब्ल्यू. कुलकर्णी, पीएचएफआयचे डॉ. संजय झोडपे उपस्थित होते.
डॉ. रवींद्र कोल्हे म्हणाले की,
वैद्यकीय शिक्षण आणि तळागाळातली आरोग्याची गुंतागुंत यात बरेच अंतर असते. ग्रामीण दुर्गम भागातल्या आजाराला सामाजिक, भौगोलिक, आर्थिक, कौटुंबिकदेखील इतिहास चिकटलेला असतो. इंटर्नशीपदरम्यान मेळघाट भागात काम करताना हे प्रकर्षाने जाणवले. त्यामुळे तेथील आरोग्याचे प्रश्नही स्थानिक परिस्थितीची सांगड घालूनच सोडवावे लागतात.
डॉ. आशिष सातव म्हणाले
कुपोषण, बालमृत्यू आणि मातामृत्यूमुळे मेळघाट ‘शापित नंदनवन’ झाले आहे. आजही मेळघाटात जन्माला येणाऱ्या दर हजार बालकांपैकी ६० बालके उपजत मृत्यू पावतात. तीव्र कुपोषणाचा दर १४ टक्के, तर तरुणांचा मृत्यूदर हजारी चारशेवर पोहोचला आहे. याकडे आरोग्य धोरण ठरविणाऱ्यांचे लक्ष गेलेले नाही. सरासरी लोकसंख्येच्या १० टक्के लोकसंख्या आदिवासी असली तरी यातील ९० टक्क्यांपर्यंत आरोग्य पोहोचलेले नाही, हे दाहक वास्तव आहे. अकाली दगावणाऱ्या या तरुणांच्या मृत्यूचेही ऑडिट करून त्याचा आरोग्य धोरणात समावेश केला गेला पाहिजे.
प्रास्ताविक विभागप्रमुख डॉ. उदय नारलावार यांनी केले. डॉ. कुळकर्णी यांनी डॉ. रामदवार यांच्या कार्यावर प्रकाश टाकला.