मुंबई बहुजननामा ऑनलाईन – नुकताच मुंबई उच्च न्यायालयाने मराठा समाजाला शैक्षणिक क्षेत्रात १२ टक्के आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये १३ टक्के आरक्षण देण्यावर शिक्कामोर्तब केले. मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्यासंबंधीचा कायदा राज्य सरकारने ३० नोव्हेंबर २०१८ रोजी मंजूर केला होता. याला अनेक संघटना वकील (सदावर्ते) नेत्यांनी विरोध केला होता आणि आरक्षणाविरोधात न्यायालयात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.
सध्याचे औरंगाबादचे नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांनीही विरोध केला होता. परंतु, जलील यांचे बोल आता बदललेले दिसत असून मराठा समाजाला ते मोठा भाऊ म्हणून संबोधत असलयाचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी मराठा समाजाला दिलेले आरक्षण चुकीचे असल्याचे सांगत जलील यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. जलील त्यावेळी एमआयएमचे आमदार होते. परंतु, २७ जून रोजी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारकडून मराठा समाजाला दिलेले आरक्षण वैध ठरवले.
दरम्यान लोकसभा निवडणुकीनंतर औरंगाबादचे नवनियुत खासदार इम्तियाज जलील यांची भाषा बदलल्याचे चित्र सध्या दिसत आहे. मराठा समाज हा आमचा मोठा भाऊ असल्याचे जलील यांनी नमूद केले. आमदार असताना मराठा आरक्षणाविरोधात याचिका केली होती आणि आणि खासदार झाल्यावर मराठा समाज हा मोठा भाऊ अशी दुहेरी भूमिका घेणारे खासदार इम्तियाज जलील यांच्या भूमिकेमुळे इम्तियाज जलील यांचा मतदार आणि चाहता वर्ग त्यांच्यापासून नाराज होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.