मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. मराठा भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून अनेक संस्था आणि संघटनांनी केंद्र सरकारकडे मागणी केलीय मात्र त्यात फारशी प्रगती झालेली नाही. हे प्रकरण मनुष्यबळ मंत्रालयात रखडलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासाठी पुढाकार घेतलाय. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशी मागणी करणारं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलं आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी स्वत: पंतप्रधानांनी लक्ष द्यावे अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून सुरू होते. प्रा.रंगनाथ पठारे यांच्या नेतृत्वाखालील समितीनं पाचशे पानांचा अहवाल केंद्र सरकारकडे सादर केला होता. आतापर्यंत केंद्रानं तमिळ, संस्कृत, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम भाषेला हा दर्जा दिलाय. १६ नोव्हेंबर २०१३ रोजी राज्य सरकारने स्थापन केलेल्या तज्ञ समितीने प्रस्ताव सादर केला होता मात्र हा प्रस्ताव अजूनही केंद्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयातच प्रलंबीत आहे. त्यामुळे आता स्वत: पंतप्रधानांनीच या प्रकरणात लक्ष घालावं असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.
अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे नेमकं काय ?
१] त्या भाषेला भाषिक आणि वाडःमयीन परंपरेचे स्वयंभूपण असावे.
२] ज्या भाषेतलं साहित्य श्रेष्ठ दर्जाचं ती भाषा अभिजात.
३] प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक रुप यांचा गाभा कायम असावा.
४] त्या भाषेला दीड ते अडीच हजार वर्षांचा इतिहास हवा.
मराठी भाषेची महती दुर्गाभागवतांचे आजोबा राजारामशास्त्री भागवत यांनी १८८५ साली, तर ज्ञानकोषकार श्री. व्यं. केतकर यांनी १९२७ सालीच त्यांच्या ग्रंथांमधून लिहून ठेवली आहे. एकूण ५२ बोली भाषेपासून आपली मराठी भाषा नटलेली आहे. मराठी अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी राज्य सरकारने अशा प्रकारचे प्राचीन संदर्भ दिले आहेत.
गाथा सप्तशती हा मराठीतील मूळ ग्रंथ असल्याचा पुरावाही पठारे समितीनं सादर केला आहे. त्यामुळं या भाषेचं वय दोन हजार वर्षांपूर्वीचं आहे, याचा अंदाज येऊ शकेल. अभिजनांची भाषा म्हणजे अभिजात भाषा असा आतापर्यंत प्रस्थापित समज होता. पण प्रा. रंगनाथ पठारे समितीनं आपल्या अहवालातून त्याची उत्तम मांडणी केली आहे.
मराठीचं वय ८०० वर्षे सांगितलं गेल्यामुळंही त्याला अभिजात दर्जा मिळण्यासाठी अडथळे येत होते. मराठी ही संस्कृतपासून जन्माला आली हा गैरसमज पुराव्यानिशी दूर करण्याचा प्रयत्न पठारेंनी त्यांच्या अहवालाच्या माध्यमातून केला आहे. मराठी ही फक्त प्राचीन भाषा आहे असं नाही तर, तिच्यात श्रेष्ठ साहित्याची सातत्यपूर्ण परंपरा आहे. म्हणूनच मराठी अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून मागणी केली जातेय.