मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – आज अर्थमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात राज्यावरील वाढलेला कर्जाचा बोजा, दरडोई उत्पन्नात झालेली घसरण, घटलेली परकीय गुंतवणूक, अशी मोठी आव्हाने त्याच्यासमोर होती. दरम्यान या अर्थसंकल्पात अजित पवारांनी शेतकऱ्यांसाठी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या. मागील वर्षी कर्जमाफीची जी प्रक्रिया सुमारे दीड वर्ष चालली होती त्यास आम्ही दोन महिन्यात पूर्ण करू असा टोला यावेळी त्यांनी समोर बसलेल्या देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
अर्थमंत्री अजित पवारांनी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी २२ हजार कोटींची तरतूद करण्यात येईल असे स्पष्ट केले. तसेच शेतीला दिवसा वीज पुरवठा उपलब्ध करण्यासाठी दरवर्षाला १ लाख असे ५ लाख सौर कृषीपंप बसवण्याचा महत्वाचा निर्णय त्यांनी घेतला. या योजनेसाठी सुमारे १० हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून यासाठी अर्थसंकल्पात ६७० कोटी रुपयांची रक्कम प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती देखील देण्यात आली.
त्यांनी यावेळी शेतीसाठी होणारा पाणी पुरवठा हा दिवसा करण्यावर जास्त भर दिला. तसेच भूजल पातळी वाढवण्यासाठी ‘मुख्यमंत्री जलसंधारण योजना’ देखील राबवण्यात येईल असे त्यांनी सांगितले. त्यासाठी जलसंपदा विभागासाठी १०,०३५ कोटींची तरतूद करण्यात आली असून अल्पभूधारक शेतकऱ्यांना ठिबक सिंचनासाठी ८० टक्के अनुदान देण्यात येईल, असे त्यांनी सांगितलं. तसेच जे शेतकरी नियमित कर्ज फेड करतात अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ५० हजार रक्कम देण्यात येणार असल्याची घोषणा देखील यावेळी अर्थमंत्री अजित पवार यांनी केली.