लुधियाना : वृत्तसंस्था- ज्या युवकाच्या हत्येप्रकरणी 3 पोलीस कर्मचारी अनेक वर्षांपासून खटला लढत होते तो युवक 14 वर्षांनी जिवंत सापडला आहे. त्याच्या हत्येच्या आरोपावरून कुटुंबाने बरेच प्रयत्न करून 3 पोलिसांविरोधात गुन्हा दाखल केला होता. कुटुंबाला शासनाकडून नुकसानभरपाई देखील मिळाली होती. सेवानिवृत्त डीएसपी अमरजीतसिंह खैरा, एएसआय जसवंत सिंह आणि (तत्कालीन हवालदार) एएसआय काबलसिंह हे या खटल्याचा सामना करत होते. जिवंत सापडलेल्या या तरूणाला पोलिसांनी अटक केली आहे.
एएसआय जसवंत सिंह यांनी सांगितले की, 2005 मध्ये ते डेहलो ठाण्यात तैनात होते. तेव्हा 25 ऑगस्ट 2005 रोजी अन्य पोलीस कर्मचाऱ्यांसह रंगीया गावातील हरदीप सिंहला लाचप्रकरणी अटक केली. त्याच्या विरोधात डेहलोमध्ये खटला दाखल करण्यात आला. पोलिस त्याला चौकशीसाठी आणत असताना, तो रायपूर सुया किल्ल्याजवळ येताच पोलिसांना बुंगारा देत फरार झाला. यानंतर नगिंदर सिंहने मुलगा हरदीप सिंहला पोलिसांनी अवैधरीत्या ताब्यात घेतल्याची शंका व्यक्त करत 28 ऑगस्ट रोजी वॉरंट अधिकाऱ्याकडून रेड टाकली. डेहलो ठाण्यात आणि लताला पोलीस चौकीत तलाशी नंतर तिथे हरदीप नसल्याचं समजलं. यानंतर असे समजले की, हरदीप विरोधात लाच दिल्याचा आणि पोलिसांना बुंगारा देत फरार होण्याचा आरोपाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
17 सप्टेंबर 2005 रोजी दाया कला गावातून एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. पिता नगिंदर यांनी हाय कोर्टात याचिका दाखल करत सांगितले की, तो मृतदेह मुलगा हरदीपचा आहे. पोलिसांनी हरदीपचा खून करत मृतदेह फेकून दिला. हाय कोर्टाने या प्रकरणाचा तपास एडीजीपी क्राईम ब्रांचकडे सोपवला. तपास अहवालात ते म्हणाले की, सापडलेला मृतदेह हरदीप सिंहचा नव्हता तर दुसर्या एखाद्या व्यक्तीचा होता. हरदीप सिंह मरण पावला नाही. त्यांनी हरदीप सिंह आणि इतरांविरोधात खटला दाखल करण्याची शिफारस केली. एएसआय सुखबीर सिंह यांनी गुन्हा दाखल केला. सर्व आरोपींना अटक करण्यात आली, परंतु या प्रकरणात हरदीप सिंहला फरार घोषित करण्यात आले.
नगिंदर सिंह यांनी पुन्हा एकदा हाय कोर्टाचा दरवाजा ठोठावला आणि या प्रकरणी तपासाची मागणी केली. हायकोर्टाच्या आदेशावरून लुधियानाच्या सत्र न्यायाधीशांनी तपास केला आणि आपल्या अहवालात म्हटले होते की, सापडलेला मृतदेह हरदीप सिंहचा होता. याला अज्ञात म्हणत पोलिसांनी आयपीसीच्या कलम 174 अन्वये कारवाई केली आहे. सत्र न्यायाधीशांनी तत्कालीन डीएसपी अमरजीतसिंह खैरा, एएसआय जसवंत सिंह आणि हवालदार काबलसिंग यांच्याविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. 21 ऑगस्ट 2010 रोजी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.