पटना : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणूकीच्या रणधुमाळीमध्ये बिहारमध्ये काही दिवसांच्या चर्चेनंतर महाआघाडीचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) आणि काँग्रेस नेत्यांच्या दिल्लीत झालेल्या चर्चेनंतर बिहारमधील ४० लोकसभा जागांसाठी महाआघाडीचा निर्णय झाल्याचे म्हटले आहे. या अगोदर महाआघाडीमध्ये जागा वाटपावरून बोलणी सतत फिसकट होती पण अखेर काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल दिलजमाई झाली आहे.
बिहारमध्ये महाआघाडीच्या पार्श्वभूमिवर आरजेडी १९ आणि काँग्रेस ९ जागांवर निवडणूक लढविणार आहे. तर बाकी जागावर महाआघाडीतील आरएलएसपी (राष्ट्रीय लोक समता पक्ष) या सारखे छोटे- छोटे पक्ष निवडणूक लढविणार आहेत. या जागावाटपामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाला सामील करण्यात आलेले नाही. सीपीआयएम बेगूसरायमधून कन्हैया कुमार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही जागा महाआघाडीकडून कन्हैया कुमार यांच्यासाठी सोडण्यात येण्याची दाट शक्यता आहे.
काँग्रेसने ज्या २ जागा सोडल्या आहेत, त्या सीपीआयएमला देण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. तर उपेंद्र कुशवाह यांच्या आरएलएसपीला (राष्ट्रीय लोक समता पक्ष) ४ जागा, जीतन मांझी यांच्या हिंदूस्थान आवाम मोर्चाला (एस) २ जागा तर शरद यादव यांच्या एलजेडीला २ आणि मुकेश सहानी यांच्या व्हीआयपीला १ जागा देण्यात आली आहे.