नांदेड : बहुजननामा ऑनलाईन – वीरशैव लिंगायत समाजाच्या न्याय हक्कांच्या मागण्यांसाठी शिवा संघटनेचे अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि. २५) मुंबईत विधीमंडळावर प्रचंड एल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे. सोलापूर विद्यापीठाला शिवयोगी श्री सिद्धेश्वर विद्यापीठ असे नाव द्यावे, महाराष्ट्रातील वीरशैव लिंगायत समाजातील उर्वरित ३२ जातींचा ओबीसी – एसईबीसी व एनटी प्रवर्गात समावेश करून आरक्षण द्यावे, महाराष्ट्र शासनाच्या ओबीसी यादीत समाविष्ट केलेल्या २१ जातींचा केंद्र शासनाच्या ओबीसी प्रवर्गाच्या आरक्षण यादी मध्ये समावेश करणे, मंगळवेढा (जि. सोलापूर) येथे महात्मा बसवेश्वर यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे काम कृषी विभागाच्या ६२ एकर जमिनीवर त्वरित सुरू करणे आणि वीरशैव लिंगायत समाजातील युवकांच्या हाताला काम देण्यासाठी महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास स्थापन करणे यासह अन्य १५ मागण्या मंजूर करुन घेण्यासाठी सोमवारी एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन शिवा संघटनेचे तालुकाध्यक्ष मनोज शेलगावकर, व्यापारी आघाडीचे तालुकाध्यक्ष गणेश घोडके, सरपंच कैलास धोंडे, सतीश आणेराव, साधू पाटील वडजे, कालीदास मुसतापुरे, लक्ष्मण कांजले, दत्ता शेटे, स्वप्नील शेटे, पिंटू वडडे, बालाजी एकलारे, शुभम घोडके आदींनी केले आहे.