कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाईन – जात, धर्मात भांडणे लावण्याचे काम भाजप सरकारने केले आहे. त्यामुळे यावेळी या सरकारला जननेते घरी बसवण्याची गरज आहे. पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी गेल्या चार दशकात मोठ्या प्रमाणात संघर्ष केला आहे. त्याचे काम कौतूकास्पद आहे. असे प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी केले. प्रा. कवाडे यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सत्कार समारंभात ते बोलत होते.
आमदार सतेज पाटील पुढे म्हणाले, पाच वर्षाचा भाजपचा कारभार पाहिला तर तो फसवा आहे. त्यामुळे सर्वांनी हातात-हात घालून काम केले पाहिजे. मनं जुळली पाहिजे. तरच, आपण यांना घालवू शकतो. समाजाला एकत्रित बांधण्याचे काम करा. प्रा. कवाडे यांनी मातीतील माणसांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. ते खरेखुरे पुरोगामी विचारांचे आहेत.
कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे म्हणाले, सत्ताधाऱ्यांना टक्कर देण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी मोट बांधली पाहिजे तरच मनुवादी प्रवृत्तील हद्दपार होईल. हा लढा सर्वांचा आहे. जोेगेंद्र कवाडे म्हणाले, राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले व विश्वरत्न डॉ.बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारामुळे देशाला ऊर्जा मिळाली.
शाहू स्मारक भवन येथे झालेल्या कार्यक्रमावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे,पीपल्सचे कार्याध्यक्ष जयदीप कवाडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. सतेज पाटील व आवाडे यांच्या हस्ते मानपत्र,चषक व पुष्पहार घालून कवाडे यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी जयदीप कवाडे यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,ना. रामदास आठवले यांच्यावर सडकून टीका केली. आता धर्मनिरपेक्ष एकत्र येत आहे म्हटल्यावर सत्ताधाऱ्यांनी त्यांची धास्ती घेतली आहे. याप्रसंगी रतन कांबळे संग्रहित कार्यकत्र्ता गौरव ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. जिल्हाध्यक्ष डी. जी.भास्कर,नंदकुमार गोंधळी आदींनी मनोगत व्यक्त केले. सुनील सुर्यवंशी यांनी स्वागत तर विद्याधर कांबळे यांनी प्रास्ताविक केले. सुरेश सावर्डेकर यांनी आभार मानले.