हिंगोली : बहुजननामा ऑनलाईन – धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण देण्याचे आश्वासन भाजपा सरकारने निवडणुकीपुर्वी दिले होते. पण, अद्यापही ही मागणी मान्य न झाल्याने धनगर समाज बांधवात नाराजी पसरली आले. आरक्षणाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी धनगर बांधव हिंगोलीच्या रामलीला मैदानावर एकत्र आले होते.
भाजपाने सत्तेत येण्यापुर्वी धनगर- हटकर समाजाला आरक्षण देवू, असे जाहीर केले होते. त्यानंतर हे आरक्षण प्रत्यक्ष लागू करण्यासाठी गेल्या साडेचार वर्षांपासून धनगर समाजाच्या प्रतिनिधींनी वेळोवेळी आंदोलनही छेडले. पण, अद्यापही आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. धनगड व धनगर यातील ‘ड’ आणि ‘र’ च्या फरकामुळे हा आरक्षणाचा मुद्दा खितपत पडला आहे. धनगर व धनगड हे एकच असून, धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या सवलती देण्याची मागणी होत आहे. आरक्षणासाठी मागील अनेक वर्षांपासून आंदोलने छेडली जात आहेत. परंतु, सरकारकडून याकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याने धनगर बांधव न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. शुक्रवारी धनगर समाज बाधवांनी रामलीला मैदानावर एकत्र येत आरक्षणाच्या मुद्यावर आवाज उठविला. यावेळी आ.रामराव वडकुते, अशोक नाईक, गजानन डाळ यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.