बहुजननामा ऑनलाइन टीम – निर्यात बंदी उठताच कांदा (Onion)भावात आज येथील मुख्य बाजार समितीत ४७० रुपयांची तेजी दिसून आली .कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन केल्याने शेतमालाला कवडीमोल भाव मिळत होता. सप्टेंबरमध्ये शेतमालाला योग्य भाव मिळायला लागले असताना केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम केले होते. मात्र काल पियुष गोयल यांनी ट्विट करत कांद्यावरील निर्यात बंदी १०५ दिवसांनंतर हटवले असून त्याचाच परिणाम कांदा भाव वाढीवर झाला आहे.आज लाल कांद्याला कमाल २५५०रुपये तर सरासरी २२०० प्रति क्विंटल भाव मिळाला.
दरम्यान, तब्बल १०५ दिवसांनतर निर्यातबंदी उठवल्यामुळे कांद्याचे भाव वाढले आहेत.
लासलगावमध्ये कांद्याच्या भावात ४७० रुपयांची वाढ झाली आहे. निर्यातबंदी उठवल्यामुळे ही भाववाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. अडीच महिन्यांनतर कांद्याचा भाव वाढल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या समाधानाचे वातावरण आहे. लासलगाव येथील बाजारामध्ये कांद्याचा कमाल भाव प्रतिक्विंटल २५५० रुपये असून किमान भाव १००० रुपये आहे .तर सर्वसाधारण भाव प्रतिक्विंटलमागे २२०० रुपये इतका आहे.