नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाईन – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना महाआघाडीत यायचे होते, मात्र त्यांच्यावरील विश्वास पूर्णत: उडाल्याने मी त्यांना महाआघाडीत घेतले नाही, असा दावा राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी केला आहे. महाआघाडी सोडून भाजप सोबत गेल्यानंतर सहा महिन्यातच नितीश कुमार पुन्हा महाआघाडीत येण्यासाठी उत्सुक होते, असे खळबळजनक विधान लालू यांनी केलं आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी त्यांच्या ‘गोपालगंज टू रायसीना : माय पॉलिटिकल जर्नी’ या पुस्तकातून हा गौप्यस्फोट केला आहे. लालू यांनी हे पुस्तक नलिन वर्मा यांच्या सहकार्याने लिहिले आहे हे पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे.
नितीश कुमार यांनी त्यांच्या (जेडी यू ) पक्षाचे उपाध्यक्ष आणि त्यांचे विश्वासातील प्रशांत किशोर यांना पाचवेळा आपल्याकडे पाठविले. प्रशांत किशोर यांनी प्रत्येकवेळा नितीश कुमार यांच्या विषयी सांगत माझी मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र. मी त्यांना महाआघाडीत घेण्यास विरोध केला, असे लालू प्रसाद यादव यांनी म्हटले आहे.
लालू आपल्या पुस्तकात लिहितात की, ( जेडीयू ) ला लिखीत पाठिंबा दिल्यास नितीश कुमार भाजप बरोबरची युती तोडून महाआघाडीत वापसी करतील, असे सांगण्याचा प्रयत्न किशोर यांनी केला. दरम्यान, नितीश कुमार यांच्या विषयी माझ्या मनात कोणत्याही प्रकारचा राग नाही. मात्र, त्यांच्यावरील माझा विश्वास पूर्णपणे उडाला आहे, असे लालूंनी म्हटले आहे. जर मी प्रशांत किशोर यांचा प्रस्ताव स्वीकारला तर २०१५ मध्ये महाआघाडीला मतदान देणारा आणि देशभरात भाजपच्या विरोधात एकजूट झालेल्या अन्य पक्षांनी काय प्रतिक्रिया व्यक्त केली असती, हे मला माहित नाही.