बहुजननामा : ऑनलाईन टीम – इराणने चाबहार रेल्वे प्रकल्पातून भारताला बाहेर काढले आहे. भारताकडून निधी मिळण्यात होत असलेल्या विलंबामुळे हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. भारत आणि चीनमध्ये तणाव वाढलेला असतानाच इराणने हे पाऊल उचलले आहे. इराण आणि भारत यांच्यात चार वर्षांपूर्वी चाबहारहून अफगाणिस्तान सीमेवर जाहेदानपर्यंत रेल्वे मार्ग बनवण्यासंदर्भात करार झाला होता. आता इराणने हा प्रकल्प स्वत:च पूर्ण करण्याचा निर्णय घेतला असून यावर कामही सुरु केले आहे.
भारताकडून या प्रकल्पासाठी निधी मिळण्यास विलंब होत आहे, परिणामी आम्ही स्वत:च यावर काम करण्यास सुरुवात केली आहे, असे इराणचे मत आहे. 628 किलोमीटर लांबीचा हा रेल्वे मार्ग बांधण्याचे काम मागील आठवड्यात सुरु झाले आहे. इराणचे वाहतूक शहरी विकास मंत्री मोहम्मद इस्लामी यांनी याचं उद्घाटन केले आहे. हा रेल्वे मार्ग सीमा पार करुन अफगाणिस्तानच्या जारांजपर्यंत जातो. इराणी अधिकार्यांनी सांगितले की, हा प्रकल्प मार्च 2022 पर्यंत पूर्ण केला जाईल.
यासाठी आता इराणच्या राष्ट्रीय विकास निधीचा वापर केला जाईल. चार वर्षांपूर्वी जेव्हा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणचा दौरा केला होता. तेव्हा हा करार भारत-अफगाणिस्तान आणि इराणमध्ये झाला होता. तेहरानमध्ये इराणचे अध्यक्ष रुहाणी, अफगाणिस्तानचे अध्यक्ष घणी आणि आयआरसीओएन यांच्यात चाबहार रेल्वे मार्गाच्या योजनेबाबत करारावर स्वाक्षरी केली होती. इराणी रेल्वे मंत्रालयासोबत झालेल्या या रेल्वे मार्गाच्या निर्मितीच्या करारात भारताकडून इंडियन रेल्वेज कन्स्ट्रक्शन लिमिटेडचा सहभाग होता.