नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत आणि चीन सीमेवरील परिस्थिती संदर्भात चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. आज संध्याकाळी पाच वाजता या सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. ट्विटरवरुन त्यांनी ही माहिती दिली होती. भारतातील विविध पक्षाचे प्रमुख या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत.
पूर्व लडाखच्या गलवाण खोर्यामध्ये झालेल्या संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले होते. चीनच्या बाजूलाही मोठे नुकसान झाले आहे. त्यांचे 40 पेक्षा जास्त सैनिक ठार झाले आहेत. भारताच्या जखमी जवानांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चांगली असल्याची माहितीही समोर आली आहे.
सर्वपक्षीय बैठकीपूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीदेखी विरोधी पक्षांच्या अध्यक्षांशी चर्चा केली आहे. त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, बसपाच्या अध्यक्षा मायावती यांच्यासह अन्य नेत्यांशी चर्चा केल्याची माहितीही समोर आली आहे. गलवान खोर्यात भारत आणि चीन यांच्यात युद्धसदृश स्थिती निर्माण झाल्याने उभय देशांदरम्यान संबंध ताणले गेले आहेत. या संघर्षांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी भाष्य केले होते. त्यानंतर आज ते सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेत आहेत.