नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पूर्व लडाखमधील गलवानच्या खोर्यामध्ये भारत आणि चीनच्या प्रत्यक्ष ताबारेषेवर मंगळवारी झालेल्या हिंसक झटापटीनंतर चीनने भारतीय लष्करातील 10 जवानांना ताब्यात घेतले होते. या जवानांची चीनने गुरुवारी संध्याकाळी सुटका केली आहे. त्यामध्ये दोन मेजर्सचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. ताब्यात घेतल्यानंतर तीन दिवसांनी या दहा जणांची सुटका करण्यात आली आहे.
भारतीय लष्कराच्या 10 जवानांची चिनी लष्कराने गुरुवारी संध्याकाळी सुटका केली. तीन दिवस यासंदर्भातील वाटाघाटी सुरु होती अशी माहिती या प्रकणाशी संबंधित अधिकार्यांनी दिली आहे. भारत आणि चिनी लष्करातील मेजर जनरल स्तरावरील अधिकर्यांच्या चर्चेनंतर चीनने ताब्यात घेतलेल्या भारतीय जवानांची सुटका केली. ताब्यात घेतलेल्या सैनिकांना मुक्त करण्याबरोबर गलवानमधील परिस्थिती सामान्य होण्यासाठी प्रयत्न करण्याबद्दल चर्चा झाली. चिनी सैनिकांबरोबर झालेल्या हिंसक झटापटीनंतर कोणताही भारतीय सैनिक बेपत्ता नसल्याची माहिती गुरुवारी भारतीय लष्कराने दिली होती.
चिनी सीमेवर झालेल्या या हिंसक घटनेमध्ये भारतीय लष्कराच्या एकूण 76 सैनिकांवर हल्ला करण्यात आला. त्यापैकी 18 जणांना गंभीर तर 58 जणांना किरकोळ स्वरुपाच्या जखमा झाल्या आहेत. 18 जणांवर लेहमधील रुग्णालयामध्ये उपचार सुरु असून इतर 58 जणांना वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती लष्कराने दिली आहे.