नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी भारतातील 34 टक्के कुटुबांकडे अन्नासाठी पैसे नाहीत असा दावा करत मदत करण्यास आपण तयार असल्याची ऑफर दिली होती. भारताकडून इमरान खान यांना चोख उत्तर देण्यात आले असून कोरोनाशी लढण्यासाठी भारताने जितके पॅकेज जाहीर केले आहे, तितका तर पाकिस्तानचा जीडीपीदेखील नाही अशी आठवण करुन दिली आहे.
इमरान खान यांनी भारताची मदत करण्यासाठी पाकिस्तानचा कॅश ट्रान्सफर प्रोग्राम शेअर करण्यास तयार असल्याचे म्हटले होते. त्यांनी भारतात करोनाच्या पार्श्वभूमीवर गरीब कुटुंबांना हलाखाची परिस्थिती सहन करावी लागत असल्याचा दावा करणारे ट्विट केले होते. या वक्तव्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाकडून उत्तर देण्यात आले आहे. पाकिस्तान लोकांना पैसे देण्याऐवजी देशाबाहेरील बँक खात्यांमध्येच पैसे ट्रान्सफर करण्यासाठी ओळखले जाते.
इमरान खान यांना नवे सल्लागार आणि चांगली माहिती मिळण्याची खूप गरज असल्याचे स्पष्ट दिसत आहे, असे उत्तर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी दिले आहे. पाकिस्तानवर असणार्या कर्जाची माहिती सर्वाना आहे. कर्जामध्ये ते पूर्णपणे बुडाले आहेत. पाकिस्तानचा जितका वर्षाचा जीडीपी नाही त्याहून जास्त भारताने पॅकेज जाहीर केले आहे, असे प्रत्युत्तर श्रीवास्तव यांनी दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटाशी लढण्यासाठी आणि वेगवेगळ्या क्षेत्रााला उभारी देण्यासाठी 20 लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा केली आहे.