नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेवर निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी भारत आणि चीनमध्ये चर्चेच्या फेर्या सुरु आहेत. पण मागच्या महिन्यात हा संघर्ष सर्वोच्च बिंदूवर पोहोचल्यानंतर दोन्ही देशांनी सर्वच सीमांवर सैन्य पुढे आणून ठेवले आहे.
पश्चिम, मध्य आणि पूर्व या तीन सेक्टरमध्ये रणनितीक दृष्टीने महत्वाच्या ठिकाणी दोन्ही देशांनी सैन्य तैनात केले असले तरी तिथे पूर्व लडाखसारखी स्थिती नाही. पूर्व लडाखमध्ये दोन्ही देशांचे सैनिक आमने-सामने आहेत. सहा जून रोजी दोन्ही देशांच्या वरिष्ठ सैन्य अधिकार्यांमध्ये बैठक झाली. त्यापूर्वीच मे महिन्यात दोन्ही देशांनी सर्व सीमांवर सैन्य तैनात केले. भारत आणि चीनमध्ये 3 हजार 488 किलोमीटरची सीमारेषा आहे.
लडाखमध्ये महत्वाच्या ठिकाणी भारताने 10 हजार सैन्य तुकडया तैनात केल्या आहेत. चीनने ज्या पद्धतची खेळी केली. भारताने सुद्धा त्याला तसेच उत्तर दिले. लडाखमध्ये गालवान, हॉट स्प्रिंग या भागात दोन्ही देशांनी सैन्य थोडे मागे घेतले आहे. चीन बरोबर सुरु असलेल्या या वादामध्ये लगेच काही निष्पन्न होणार नाही. दोन्ही देशांमध्ये लगेच कुठला शांतता करार होणार नाही. ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. भारतही त्यासाठी तयार आहे. शनिवारी दोन्ही देशांच्या वरिष्ठ लष्करी अधिकार्यांमध्ये झालेली प्रदीर्घ चर्चा हे त्या दिशेने उचललेले सकारात्मक पाऊल आहे. चीनला त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यासाठी भारताने लडाखमधील उंचावरील या युद्ध क्षेत्रामध्ये अतिरिक्त सैन्य तुकड्या आणि शस्त्रास्त्र तैनात केली आहेत