बहुजननामा ऑनलाइन टीम –गेल्या काही महिन्यांपासून पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे. या कालावधीत चीनकडून घुसखोरीचे प्रयत्न सुरु आहेत. चिनी सैन्याचे प्रयत्न भारतीय जवान हाणून पाडत आहेत. असे असले तरी भारतीय सेनेच्या जवानांनी चिनी नागरिकांची मदत करतानाच मानवतेचं एक उदाहरण समोर ठेवलंय. उत्तर सिक्कीम भागात अडकलेल्या तीन चिनी नागरिकांना मदत पुरवताना सेनेच्या जवानांनी भारताच्या उदारतेचा एक नवा धडा चीनसमोर ठेवला आहे. सिमेवर सैन्याशी संघर्ष सुरु असला तरी नागरिकांचा जीव वाचवणं हे पहिलं कर्तव्य असल्याचं भारतीय जवानांनी आपल्या कृत्यातून दाखवून दिलंय. ही घटना 3 सप्टेंबर रोजी घडल्याचं समोर येतंय.
Indian Army rescued 3 Chinese nationals who lost their way in North Sikkim's plateau area at 17,500 ft altitude on 3 Sept & provided medical assistance incl oxygen, food & warm clothes. Army also gave them appropriate guidance after which they returned to their destination: Army pic.twitter.com/can1mjcrSQ
— ANI (@ANI) September 5, 2020
शत्रुत्वापेक्षा माणुसकी मोठी असते, याचा प्रत्यय चीनच्या तीन नागरिकांना आला आहे. उत्तर सिक्कीममध्ये तब्बल 17500 फुटावरून अडकलेल्या चिनी नागरिकांसाठी भारतीय जवान अक्षरश: देवदूत ठरले. उत्तर सिक्कीमच्या पठारी भागात तीन चिनी नागरिक रस्ता भटकले होते. त्यातच पारा शून्यापेक्षा खाली उतरल्यानं त्यांच्या अडचणीत भर पडली. शिवाय त्यांच्या जीवालाही धोका निर्माण झाला होता. त्यांची अडचण ओळखून भारतीय जवानांनी त्यांच्या मदतीसाठी धाव घेतली.
सेनेकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, चिनी नागरिकांच्या जीवाला असलेला धोका लक्षात घेता भारतीय सेनेचे जवान ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले. एक महिला आणि दोन पुरुष शून्याहून कमी तापमानात अडकून पडले होते. भारतीय जवानांनी त्यांना वाचवण्यासाठी आपल्याकडे उपलब्ध असलेल्या ऑक्सिजनचा वापर केला. तसेच त्यांना गरम जेवण, गरम कपडे आणि वैद्यकीय सुविधा तात्काळ उपलब्ध करुन दिल्या. वेळीच मदत मिळाल्यामुळे थोडा हुरुप आलेल्या चिनी नागरिकांना इच्छित स्थळी जाण्यासाठी रस्त्याचं मार्गदर्शन करुन भारतीय जवानांनी त्यांना पुढचा मार्गही दाखवला. यासाठी चिनी नागरिकांनी भारतीय सेनेच्या जवानांचे आणि सेनेचे आभार मानलेत.