बहुजननामा ऑनलाइन टीम –अनेक लोकांना वाटते शिक्षक, प्राध्यापक, विचारवंतानी राजकारणात यावे का..? परंतु माझ्या मते राजकारण जर वाईट असते, तर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या काळात राजकारण केलेच नसते. राजकारण वाईट नाही, परंतु राजकारणामध्ये चांगले विचार व चांगल्या भूमिका मांडणार्या लोकांची गरज आहे. निर्भीडपणे लढणार्या लोकांची गरज असून, पदवीधर नवयुवकांच्या मागण्यांबाबत आवाज उठविण्यासाठी भरघाेस मतांनी निवडून देण्याचे आवाहन पुणे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार डाॅ. श्रीमंत कोकाटे(shrimant kokate) यांनी इंदापूर येथे बोलताना केले.
इंदापूर येथील संत सावतामाळी कार्यालयामध्ये डाॅ. श्रीमंत कोकाटे यांच्या प्रचारार्थ बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्रीमंत कोकाटे बोलत होते. यावेळी इंदापूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे, मा. उपनगराध्यक्ष कृष्णा ताटे, आरपीआय इंदापूर तालुकाध्यक्ष संदीपान कडवळे, आरपीआय बारामती लोकसभा कार्याध्यक्ष बाळासाहेब सरवदे, शाहीर राजेंद्र कांबळे, राष्ट्र सेवादलाचे गफूर सय्यद, रमेश शिंदे, माउली नाचन, तय्यब शेख इत्यादी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. यावेळी इंदापूर तालुका आरपीआयच्या वतीने संदीपान कडवळे व राष्ट्रसेवादलाच्या वतीने गफूर सय्यद यांनी डाॅ. श्रीमंत कोकाटे यांना पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले.
याप्रसंगी भीमाई आश्रम शाळेच्या वतीने माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे यांनी १५ हजार रुपये, गफूर सय्यद यांनी वैयक्तिक ११ हजार, व माजी उपनगराध्यक्ष कष्णा ताटे यांनी राष्ट्रसेवादलाच्या वतीने १० हजार रुपये प्रचार निधीसाठी डाॅ. श्रीमंत कोकाटे यांना देण्यात आले. यावेळी रत्नाकर मखरे, कृृष्णा ताटे, संदीपान कडवळे., गफूर सय्यद, माऊली नाचन, तय्यब शेख, रमेश शिंदे यांनी मनोगत व्यक्त करून कोकाटे यांना मतदान करण्याचे आवाहन केले. श्रीमंत कोकाटे म्हणाले की, सध्या देश आर्थीक संकटात असून, देशाची संविधानिक लोकशाही धोक्यात आहे. नोटाबंदीमुळे देशाची आर्थीक स्थिती खिळखिळी झाली आहे, तर जातीजातीमध्ये व धर्माधर्मांमध्ये द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे.आपल्या देशाला चांगली भूमिका घेणार्या लोकांची गरज असून, हीच भूमिका घेऊन आम्ही आपनासमोर आलो असल्याचे मत डाॅ. श्रीमंत कोकाटे यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक आमोल खराडे यांनी केले, तर आभार बाळासाहेब सरवदे यांनी मानले.