बहुजननामा ऑनलाइन टीम – मुद्रांक शुल्कातील सवलतीनंतर गेल्या 2 महिन्यात घरांच्या खरेदी विक्री व्यवहारात विक्रमी वाढ होत आहे. अशात घरासाठी आवश्यक असलेल्या गृह कर्जाचीही( Home loans )मागणी वाढली आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आता बँकांची स्पर्धा सुरू आहे. आता सर्व प्रमुख बँकांच्या गृह कर्जाचे दर 7 टक्क्यांपेक्षा खाली आले आहेत.
राज्य सरकारनं दिलेली मुद्रांक शुल्क सवलत आणि विकासकांकडून दिल्या जाणाऱ्या विविध आकर्षक ऑफर्समुळं ऑक्टोबर महिन्यात मुंबईतील घरांचे खरेदी विक्री व्यवहार जवळपास तिपटीनं वाढले (ऑगस्टच्या तुलनेत) आहेत. उर्वरीत राज्यातही गृह खरेदीसाठी अनुकूल वातावरण आहे. घरांची नोंदणी केल्यानंतर जवळपास 90 टक्के ग्राहक हे कर्जाचा पर्याय निवडतात. त्यामुळं बँकांमध्ये गृह कर्ज घेणाऱ्यांची लगबग वाढली आहे. सध्याच्या आर्थिक अरिष्टांच्या काळात बँका कर्ज पुरवठा करताना अत्यंत सावध पवित्रा घेत आहेत. परंतु गृहकर्ज हा बँकांसाठी सर्वाधिक सुरक्षित पर्याय मानला जातो. त्यामुळं याच श्रेणीतील जास्तीत जास्त कर्ज पुरवठा करण्यासाठी बँका तत्पर आहेत. त्यामुळं स्पर्धा वाढली असून त्याचा फायदा ग्राहकांना होणार आहे. असं मत एका राष्ट्रीयकृत बँकेच्या संस्थापकांनी व्यक्त केलं आहे.
रिव्हर्स रेपो रेटमध्ये रिझर्व्ह बँकेनं केलेल्या कपातीमुळं बँकांनी गृह कर्जांचे दर कमी केले आहेत. त्यातच वाढत्या स्पर्धेमुळं त्यात आणखी कपात होत आहे. कोटक महिंद्रा, बँक ऑफ बडोदा, एसबीआय, आयसीआयसीआय, एचडीएफसी, युनियन बँक, एसआयसी या सर्वांनीच आपल्या गृह कर्जाचे दर साडे सहा ते सात टक्क्यांपर्यंत कमी केले आहेत. प्रोसेसिंग फी न आकारणं, महिला कर्जदारांसाठी विशेष सवलत अशा अनेक ऑफर्स बँकांकडून दिल्या जात आहेत.