बहुजननामा ऑनलाईन- गणेश नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देत भाजपमध्ये प्रवेश करण्याचे निश्चित केले आहे. त्यांच्या भाजपप्रवेशावर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांना चांगलाच टोला लगावला आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत असताना म्हणाले कि गणेश नाईक यांनी पक्षाची वाट लावली आहे.
यावेळी ते म्हणाले कि नाईक हे ५ वर्षांत पक्ष साफ करतील आणि ऐनवेळी सोडून जातील. असं मी पक्षाला वारंवार सांगत आलो आहे. मात्र पक्षाने त्याकडे अजिबात लक्ष दिले नाही. शेवटी मला जी भीती होती तेच झाले असही ते म्हणाले आणि यावेळी त्यांनी त्यांच्या मागील कामांवरही टीका केली. तसेच नाईक यांनी पक्षवाढीसाठी काहीही योगदान दिले नाही. असा आरोपही त्यांनी केला.
पुढे बोलताना ते म्हणाले कि, गणेश नाईक २०१४ मध्येच राष्ट्रवादी सोडणार होते. जेव्हा पवार यांचे ऑपरेशन सुरू होते. तेव्हा गणेश नाईक हे गुप्त बैठका घेत होते. त्यांच्या या हालचालींविषयी मी पक्षाला वारंवार सुचित केले. मात्र पक्षाने माझ्या सांगण्याकडे दुर्लक्ष केले. गणेश नाईक हे पाच वर्षांत पक्ष साफ करतील आणि ऐनवेळी सोडून जातील, असे मी वारंवार सांगत होतो. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले गेले.
दरम्यान, गणेश नाईकांच्या भाजप प्रवेशावर भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. त्यावरही आव्हाडांनी त्यांचे मत मांडले आहे. मंदा म्हात्रे सांगत आहेत, त्या गणेश नाईकांच्या नेतृत्वाचा स्वीकार करणार नाहीत, मग आता यावर गणेश नाईकांचा स्वाभिमान कुठे गेला, असा टोलाही त्यांनी लगावला.