भंडारा : बहुजननामा ऑनलाइन – मच्छीमार व भटक्या समाजाच्या मागण्या शासन गंभीरतेने घेत नसेल तर येणाऱ्या निवडणुकीत हा समाज त्यांची जागा दाखविल्याखेरीज राहणार नाही, राजकीय पुढाऱ्यांनी या मच्छीमार व भटक्या समाजाला अराजकीय समजू नये, असे प्रतिपादन संघर्ष वाहिनीचे दिनानाथ वाघमारे यांनी केले. भंडारा येथील सेव्हनहिल लॉन येथे आयोजित सभेत ते बोलत होते.
यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी प्रा. के. एन. नान्हे होते. वाघमारे पुढे म्हणाले, संघर्ष वाहिनी मच्छीमार व भटक्या समाजाला त्यांच्या हक्कासाठी कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यास तयार आहे. शासन या समाजाला निव्वड आश्वासने देऊन वेळकाढू धोरणाचा अवलंब करताना दिसत आहे. इदाते आयोगाच्या शिफारशी लागू व्हायला पाहिजेत यासाठी, कसोशीने प्रयत्न करणे सुरू आहेत. आजपयंर्त सत्ता भोगणाऱ्या नेत्यांनी व पक्षांनी आर्थिक दृष्ट्या कमकुवत असणाऱ्या मच्छीमार व भटक्या समाजाला राजकारणापासून दूर ठेवले आहे. त्यामुळे या समाजाचा विकास खुंटला आहे. या समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी संघर्ष वाहिनी येत्या निवडणुकीत मच्छीमार व भटक्या समाजाला संघटित करून या समाजाचा वापर करून घेणाऱ्या नेत्यांना धडा दिल्याशिवाय राहणार नाही, असे मत व्यक्त केले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रकाश महालगावे तसेच संघर्ष वाहिनीचे उमराव मांढरे, अशोक शेंडे, भंडारा जिल्हा संयोजक लोकेश नगरे, हौसीलाल वलथरे, हर्षल वाघमारे, महेश अहिरकर, आशिष दिघोरे यांच्यासह मच्छीमार व भटक्या समाजातील भंडारा, गोंदिया, नागपूर येथील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.