नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – संविधानातील सामाजिक तसेच कल्याणकारी न्यायाचा विचार लोकांपर्यंत पोहोचविणे हा उद्देश ठेवून पहिल्या भारतीय संविधान साहित्य संमेलनाचे आयोजन येत्या ८ व ९ जून रोजी नागपुरात होणार आहे .महाराष्ट्रभूषण डॉ. अभय बंग हे या संमेलनाचे उद्घाटक असून, उच्च न्यायालयाचे निवृत्त न्या. किशोर रोही हे संमेलनाचे अध्यक्ष असतील.
माजी सनदी अधिकार ई. झेड. खोब्रागडे यांच्या पुढाकारातून संविधान फाऊंडेशनतर्फे दीक्षाभूमीजवळील सभागृहामध्ये हे संमेलन होईल. संमेलन स्वागताध्यक्षा रेखा खोब्रागडे या आहेत. दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात संविधानिक हक्क व कर्तव्याला धरून विविध विषयांवर चर्चासत्र व परिसंवादाचे आयोजन केले जाणार आहे. उद्घाटनीय सत्रात अन्न व औषधी विभागाच्या आयुक्त डॉ. पल्लवी दराडे, विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार, ‘यशदा’चे संशोधन अधिकारी डॉ. बबन जोगदंड विशेष अतिथी असतील.
कार्यक्रमावेळी भारतीय सनदी सेवेतील १९५६ च्या तुकडीचे ज्येष्ठ सनदी अधिकारी पी. एस. कृष्णन (दिल्ली) यांचा प्रशासकीय व सामाजिक क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कार्याबद्दल सत्कार केला जाईल. तसेच विविध सामाजिक संघटनांना डॉ. भीमराव रामजी आंबेडकर संविधान सन्मान-२०१९’ देऊन गौरव केला जाईल. ज्येष्ठ कवी इ. मो. नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली संविधान काव्यसंध्येचे आयोजन करण्यात आले आहे.
संमेलनाच्या जन जागृतीसाठी सहकार्याचे आवाहन प्रा. महेंद्रकुमार मेश्राम, दीपक निरंजन, विजय बेले, शिरीष कांबळे, नेहा खोब्रागडे, दिगंबर गोंडाणे, दीपक अवथरे, विजय कांबळे आदींनी केले आहे.