मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात तृतीयपंथीय कल्याण मंडळाची स्थापना करण्यात आली असून त्या माध्यमातून तृतीयपंथीय नागरिकांचे कल्याण करून त्यांच्या हक्काचे संरक्षण होईल तसेच त्यांना सन्मानाने जगण्याचा अधिकार त्यांना मिळेल आणि असा विश्वास सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी मुंबई येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
तृतीयपंथीय हा समाजातील दुर्लक्षित घटक त्यांच्याप्रती असलेल्या गैरसमजातून त्यांना समाजाकडून भेदभावाची वागणूक दिली जाते . त्यामुळे हा घटक कायम विकासाच्या प्रक्रियेपासून दुर्लक्षित राहिलेला आहे . त्यामुळे सामाजिक घटकांचे पालकत्व स्वीकारलेल्या शासनाने तृतीयपंथाच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आणि कल्याणासाठी उपाययोजना करणाऱ्या तृतीय कल्याण मंडळाची स्थापना केली आहे .
सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली स्थापित या कल्याण मंडळाचे सह अध्यक्ष सामाजिक न्याय राज्यमंत्री असून विभागाचे प्रधान सचिव उपाध्यक्ष आहेत. तृतीयपंथीय समुदायातील एक विख्यात व्यक्ती सहउपाध्यक्ष तर विधान परिषद, विधानसभेचा प्रत्येकी एक सदस्यासह विधी, वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील प्रत्येकी एक व्यक्ती सदस्य असेल. याशिवाय विविध १४ विभागाचे सह सचिव/उपसचिव दर्जाचा एक प्रतिनिधी सदस्य, तर बार्टी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान, एड्स कंट्रोल सोसायटीचा प्रत्येकी एक सदस्य तर आयुक्त समाजकल्याण हे मंडळाचे सदस्य सचिव व समन्वयक असलेली राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे.