कल्याण : बहुजननामा ऑनलाईन – रिपाइं (ए) चे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावर हल्ला चढवणारा त्यांच्याच पक्षातील पदधिकारी प्रवीण गोसावी याची दीड महिन्यानंतर कारागृहातून सुटका केली आहे. कारागृहातून सुटल्यानंतर रामदास आठवले यांच्या बद्दल प्रवीण गोसावीने गंभीर वक्तव्य केले आहे. कारागृहातून सुटल्यानंतर रामदास आठवले आपल्याला ठार मारतील असे गंभीर विधान आठवलेंवर हल्ला करणाऱ्या प्रवीण गोसावीने केले आहे.
८ डिसेंबर रोजी अंबरनाथ येथे झालेल्या सभेत रामदास आठवले यांच्यावर प्रवीण गोसावी यांनी हल्ला चढवला होता. त्यावेळी आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी त्याला बेदम मारहाण केली होती. प्रवीण गोसावी या आधी रामदास आठवले यांच्या पक्षाचा कार्यकर्ता होता. मात्र पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून त्याने आरपीआयला सोडचिठ्ठी दिली होती.
रामदास आठवले यांच्यावर हल्ला केल्यापासून काल शुक्रवार पर्यत गोसावी हा आधारवाडी येथील तुरुंगात होता. दीड महिन्या नंतर सुटका झाल्यावर त्याने आपली बाजू माध्यमांसमोर मांडली आहे. रामदास आठवले आंबेडकरी जनतेची मते घेऊन भाजप आणि आरएसएसच्या लोकांसोबत युती करतात म्हणून आंबेडकरी जनतेत रामदास आठवले यांच्या बद्दल राग आहे आणि मी त्या रागाचे प्रतिनिधित्व केले असे गोसावी म्हणाला आहे.