मालेगाव : बहुजननामा ऑनलाईन – काँग्रेस आणि राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष राज्यात सतेवर असताना मुस्लिम समाजामधील ५० पोटजातींना दि. १९ जुलै २०१९ ला दिलेले ५ टक्के आरक्षण त्वरित बहाल करावे. तसेच मुस्लिम समाजाला भेडसावणार्या १९ गंभीर समस्यांचे निवारण करावे. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी भिवंडी ते मुंबई पदयात्रा काढण्यात दि.२६ फेब्रुवारी आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात येईल.असा इशारा आमदार शेख आसिफ शेख रशीद यांनी दिला आहे.
न्या. राजेंद्र सच्चर. न्या. रंगनाथ मिश्रा व डॉ. महेमुदूर रहेमान समितीने अहवाल दिला आहे. त्यातील शिफारशी शासनाने मान्य केल्या आहेत.राज्याच्या एकूण लोकसंख्येपैकी १५ ते २० टक्के लोकसंख्या ही मुस्लिम समाजाची आहे. या समाजातील शैक्षणिक, सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याची गरज आहे.
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शासनाने पाच टक्के आरक्षण मंजूर केले होते. पण उच्च न्यायालयाने नोकरीतील आरक्षण रद्द करून शिक्षणातील पाच टक्के आरक्षण कायम ठेवले होते. परंतु भाजप सेना युतीच्या शासनाने वेळकाढू धोरण स्वीकारून शिक्षणातील पाच टक्के आरक्षणाबाबत कार्यवाही केली नाही. व अध्यादेश रद्द झाला.
या आहेत प्रमुख मागण्या
१) मुस्लिम समाजातील शाह, छप्परबंद, फकीर समाजास भटक्या विमुक्त या प्रवर्गात आरक्षण देण्यात यावे.
२) त्यांना जात प्रमाणपत्र देण्यात यावे.
३)मुस्लिम समाजबांधवांच्या संरक्षणासाठी अॅट्रॉसिटीसारखा कायदा करावा.
४)मुस्लिम, मेहत्तर समाजाच्या सफाई कामगारांच्या वारसांना लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार वारसाहक्क लाभ द्यावा.
५)महेमुदूर रहेमान समितीच्या शिफारशीची अंमलबजावणी करावी.
६)मुस्लिम अल्पसंख्याक नागरी वस्ती सुधार योजना लागू करून अर्थसंकल्पात तरतूद करावी.
७)मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळातील कर्ज प्रकरणे मार्गी लावावीत.
८) महामंडळासाठी एक हजार कोटी निधीची तरतूद करावी.
९)वक्फ बोर्ड जमिनीचा समाजाच्या उन्नतीसाठी उपयोग करावा.
१०) यंत्रमाग कामारांना घरकुल योजनेत मोफत घरे द्यावीत.
लवकरात लवकर मागण्या मान्य न झाल्यास रविवारी दि.२४ भिवंडी ते मुंबई विधान भवनापर्यंत पदयात्रा काढण्यात येईल. तसेच मंगळवारी दि.26 आझाद मैदानावर धरणे धरण्यात येतील. असे आमदार शेख यांनी सांगितले.