पणजी : वृत्तसंस्था – गोव्याचे उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर यांनी एक धक्कादायक विधान केले असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दलितांसाठी स्वतंत्र दलितस्तान बनवायचे होते. पण भारतातील जनता एकत्र राहिली, असे ते म्हणाले आहेत. लोकसभेत नागरिकत्व दुरुस्ती कायदापारित करून घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव गोव्याच्या विधानसभेत सादर करत असताना त्यांनी हे विधान केले आहे.
आजगावकर म्हणाले की, “फाळणीच्या वेळी मुस्लिम नव्याने निर्माण झालेल्या पाकिस्तानात गेले आणि पाकिस्तानचा जन्म झाला. आज काही लोकं हिंदू राष्ट्राची चर्चा करतात. हिंदूंमध्ये कॅथॉलिक, हिंदू, मुस्लिम, दलित सर्व समुदायातील लोकांचा समावेश होतो. दलितांसाठी स्वतंत्र दलितस्तान असेल, असे म्हटले होते. मात्र आज सर्वजण एकत्र आहेत.”
”जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिले. ज्यात हिंदू, मुस्लिम. शीख, ईसाई सर्वांचा समावेश आहे. हा देश महान असेल तर त्यामध्ये या सर्वांचे योगदान आहे,” असेही ते पुढे म्हणाले. मनोहर आजगावकर गोवा विधानसभेमध्ये पेडणे मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून पूर्वाश्रमीचे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे नेते होते. त्यांनी काही काळापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर त्यांची उपमुख्यमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली होती.