लखनौ : वृत्तसंस्था – २३ मुलांना डांबून ठेवणाऱ्या व पोलीस चकमकीत मारल्या गेलेल्या लखनऊ येथील एका व्यक्तीच्या १ वर्षाच्या अनाथ मुलीला पोलीस अधिकरी मोहित अगरवाल हे सांभाळणार असून ते तिला त्यांच्याप्रमाणे पोलीस अधिकारी बनवणार आहेत, असे त्यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले आहे.
फरुखाबाद येथे कसारिया या गावातील घटना असून पोलीस चकमकीत ठार झालेल्या सुभाष बाथमी याने या अनाथ मुलीच्या वाढदिवसासाठी २३ मुलांना गेल्या गुरुवारी आमंत्रण दिले होते. बाथमवर अगोदरपासून अनेक गुन्ह्यांची नोंद असून पोलिसांनी आपल्यावरील गुहे मागे घेण्यासाठी त्याने या २३ मुलांना आपल्या घरात तब्बल आठ तास डांबून ठेवले होते. या प्रकरणाबद्दल पोलिसांनी माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाने बाथमवर कारवाई केली. बाथमने केलेल्या गोळीबारात ८ पोलिसांसह एक नागरिक जखमी झाला. पण नंतर पोलिसांच्या गोळीबारात तो ठार झाला.
इतकेच नाही तर या मुलीचे शिक्षण करण्यासाठी तिच्या नावाचे बँक खाते काढणार असून त्यात ते नियमित पैसे भरणार आहेत. तिच्या शिक्षणात खंड पडणार नाही, याची पूणर्पणे काळजी ते घेणार आहेत, असे या पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. तसेच मोठेपणी ती माझ्याप्रमाणेच पोलीस अधिकारी व्हावी, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली. या मुलीला पोलीस अधिकारी दाम्पत्याने दत्तक घ्यावे, अशी आपली इच्छा आहे. पण तिला कोणीही दत्तक घेतले तरी मी तिच्या संगोपनावर लक्ष ठेवणार, असेही ते म्हणाले आहेत. बाथम आणि रुबी या दोघांनी कुटुंबाच्या विरोधात जाऊन लग्न केले होते, त्यामुळे या अनाथ मुलीचा सांभाळ करायला कोणीही पुढे येणार नाही. पण देशभरातून अनेकांनी या मुलीचा सांभाळ करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सध्या पोलीस खात्यातील एक महिला या मुलीचा सांभाळ करत आहे.