मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मंत्रिमंडळ विस्तारानंतर राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली असून अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार टोलेबाजी पाहायला मिळाली. त्यातच माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथही घेतली. यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलाच टोला लगावला आहे.
भाजपात आयात केलेल्या लोकांना प्राधान्य देण्यात येत असून पक्षात जुन्या लोकांना मात्र डावलले जात असल्याचा आरोप सातत्याने भाजपवर होत आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजपवर मिष्किल शब्दात टिप्पणी केली आहे. भाजपने आता आमचा तिसरा विरोधी पक्षनेताही पळवून नेऊ नये, अशी टिप्पणी केली आहे. याआधी एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते झाले, त्यांना पळवले, त्यानंतर विखे-पाटलांनाही तुम्ही तिकडे ओढून घेतले. आता तिसरे विरोधी पक्षनेते झाल्यानंतर त्यांना मात्र तिकडे घेऊ नका. निदान निवडणुका होईपर्यंत तरी त्यांना इकडे राहू द्या, अशी कोपरखळी अजित पवार यांनी लगावली. रिक्त झालेल्या विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार नियुक्ती करावी अशी मागणी अजित पवार यांनी अध्यक्षांकडे केली आहे.
यावर भाजप नेते मुनगंटीवार टोला लगावला असून आपल्याकडे लोकशाही आहे. त्यामुळे कोणाला कुठे जायचे हा अधिकार प्रत्येकालाच आहे. उद्या विजय वडेट्टीवार यांनाही आमच्याकडे यावेसे वाटले, तर त्यांचे स्वागत आहे, असे मुनगंटीवार यांनी म्हटले.