जालना : बहुजननामा ऑनलाईन – भारतीय समाज व्यवस्थेने त्या-त्या जातींना व्यवसाय निश्चित करुन दिला असून व्यवसायांवरुन त्या-त्या जातीपातींची निर्मिती झाली आहे. परंतु, जातीवर आधारित व्यवसायावर विसंबून राहू नका, असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी केले.
समर्थ व्यायाम शाळेत आयोजित पदमश्री डॉ. सुभाष जसाभाटी लिखित संत सेना महाराज यांचे जीवनचरित्र अभंगवाणी या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा व नाभिक समाजबांधवांच्या मराठवाडास्तरीय मेळाव्यात ते बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर उपनेते लक्ष्मण वडले, संतोष दोडके, गेंदालाल झुंगे, संजय टोकशिया, डॉ. प्रवीण बनवेल, गौरवकुमार संत, घनश्याम खाकीवाले, दुर्गेश काठोठीवाले, नरेश खुदभैय्ये, रतन नाईक आदींची उपस्थिती होती. जिल्हाप्रमुख अंबेकर म्हणाले की, त्या-त्या जातींच्या वाट्याला पारंपरिक व्यवसाय आला. जसे लाकडी काम करणारा सुतार, दागिने घडविणारा सोनार, कपडे शिवणारा शिंपी, मातीची भांडी बणविणारा कुंभार, लोखंडी अवजारे बनविणारा लोहार, तसे केस कापणार नाभिक या सर्व छोट्या जाती व्यवस्थेने ठरविलेले व्यवसाय करायचा व त्यातच समाधान मानायचा. परंतु वाढत्या औद्योगिकीकरणामुळे परिस्थिती पूर्णपणे बदलेली असून या जुन्या परंपरावर मोठा अघात झालेला आहे.