वर्धा : बहुजननामा ऑनलाईन – अनुसूचित जाती प्रवर्गात मोडत असलेल्या मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात अ,ब,क,ड वर्गीकरणानुसार स्वतंत्र आरक्षण तत्काळ देण्यात यावे व जलसमाधी घेणाऱ्या संजय ताकतोडे यांना न्याय व आर्थिक सहाय्यक करावे, या मागणीकरिता जिल्हा कचेरीवर धडक देण्यात आली. राष्ट्रीय लहुशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष विलास डोंगरे यांच्या नेतृत्वात निघालेला हा मोर्चा जिल्हा कचेरीवर पोहोचल्यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. मातंग समाजातील संजय ताकतोडे या तरुणाने पाली धरणाच्या पात्रात उडी घेत मातंक समाजाचे स्वतंत्र आरक्षणाकरिता जलसमाधी घेतली.
अनेक दशकापासून मातंग समाजाच्या सर्वांगिण विकासाकरिता मातंग समाज बांधव अनुसूचित या प्रवर्गामध्ये मोडत असलेल्या १३ टक्के लोकसंख्येच्या प्रमाणात मातंग समाजाला अ,ब,क,ड संविधानीक आरक्षण देण्यात यावे यासह इतर मागण्या या निवेदनामधून करण्यात आल्या. संजय ताकतोडे याच्या कुटूंबाला आर्थिक सहाय्य म्हणून ५० लाख रुपये व कुटूंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी देण्यात यावी, मातंग समाजाला आरक्षणाची तातडीने घोषणा करावी, अन्यथा मातंग समाजाच्या रोषाला शासनाला पुढे जावे लागेल, असा इशारा या निवेदनामधून देण्यात आला आहे.
यावेळी राजेश अहीर, फकिरा खडसे, पुंडलिक पवार, संगिता वानखेडे, सुमन बावने, गणेश मुंगले, अशोक डोंगरे, निलेश कांबळे, प्रफुल्ल कांबळे, गोपाळ डोंगरे, नामदेव निखारे, प्रवीण डोंगरे, प्रमीला झाडे, सुधाकर वाघमारे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.