नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – काँग्रेससोबत चर्चा म्हणजे नेमकी कुणाशी चर्चा असा सवाल उपस्थित करीत आम्ही १२ जागांची मागणी केली होती. जागांची अदलाबदली होऊ शकते. परंतु सन्मानजनक बोलणी झाली तरच काँग्रेससोबत आघाडी होईल. अन्यथा वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढण्यास तयार असल्याचे आनंदराज आंबेडकर यांनी नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत आज स्पष्ट केले.
रमाई महोत्सवासाठी ते नागपुरात आले असता रविभवन येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी रमेश जाधव, योगेश चवरे, गिरीष पुलझेले, नरेश वाहाणे उपस्थित होते.
आनंदराज आंबेडकर म्हणाले, भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात दलित, पीडित, वंचित एकवटत आहे. शिवाय पुन्हा एकदा आंबेडकरी समाज आंबेडकर कुटुंबाच्या पाठीमागे असल्याचे चित्र आहे. त्यामुळे मोठी शक्ती निर्माण झाल्याने राज्यातील राजकारणात आमूलाग्र बदल होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. जेव्हा-जेव्हा समाज एक झाला त्याचे प्रतिनिधित्व संसदेसह विधानसभेत उमटले. येत्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी दोन अंकी आकडा नक्की गाठेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सध्या तर भयावह परिस्थिती असून अल्पसंख्याक व आंबेडकरी समाजावरील अत्याचारात वाढ झाली आहे. हिंदू राष्ट्राच्या संकल्पना मांडल्या जात असतानाच संविधानच बदलण्याची भाषा मोदी सरकारमधील मंत्री करतात. तर शहरी नक्षलवादाच्या नावावर विचारवंतांना गोळ्या घातल्या जात असून कारागृहात सुद्धा डांबले जात आहे. समाजात मोठा असंतोष आहे. आरक्षणाच्या नावावर तर चेष्टा सुरू आहे. उद्या विजय माल्ल्या देशात आला तर तो सुद्धा आरक्षणाचा दावा करू शकतो, अशी टीकाही त्यांनी केली.