अकोला : बहुजननामा ऑनलाईन – भारिपचे संस्थापक अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत आघाडी करून त्यांना अकोला लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी देण्यास प्राधान्य द्यावे. अन्यथा स्वबळावर लढावे असा सूर काँग्रेसच्या बैठकीत निघाला होता. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोला लोकसभा मतदारसंघाच्या स्थितीबाबत शुक्रवार दिनांक १६ नोव्हेंबर रोजी मुंबईत आढावा घेतला.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थित अकोल्याच्या स्थितीवर मंथन झाले होते. आता तीन महिने उलटल्यावरही काँग्रेस अन् आंबेडकर यांच्या आघाडीचा गुुंताच आहे; मात्र या दरम्यानच्या काळात दोहोंनी एकमेकांवर दबावतंत्राचे राजकारण कायम ठेवत धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळण्याचाच प्रयत्न असल्याचे भासविणे सुरू केले आहे.
अकोला लोकसभा मतदारसंघातील समीकरणांचा विचार केला. तर भाजपाला थांबविण्यासाठी काँग्रेसला अॅड. आंबेडकरांची साथ हवी आहे. यापूर्वी १९९८ व १९९९ मध्ये काँग्रेस सोबत अॅड. आंबेडकरांच्या साथीने यश मिळविले होते. त्यांची पुनरावृत्ती २०१९ च्या निवडणुकीत व्हावी, असा मानस काँग्रेसचा आहे. तर दुसरीकडे काँगे्रसची साथ सोडल्यानंतर अॅड. आंबेडकरांनाही अकोला जिंकता आले नाही हा इतिहास आहे, त्यामुळे काँग्रेसनेही आंबेडकरांच्या अटी, शर्थी मान्य करून त्यांना सन्मान देत अकोला जिंकावे, असे आंबडेकरांच्या समर्थकांनाही वाटते.
त्यामुळे आघाडीच्या प्रयत्नांकडे सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागलेले आहे. आंबेडकर व काँग्रेस यांच्यामधील चर्चा बिनसल्यावर दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर जाणीवपूर्वक आघाडीचे बारा वाजविल्याचे आरोप करतात. त्यामुळे आघाडीत आमच्यामुळे बिघाडी झाली हा संदेश आपल्याकडून जाऊ नये याची काळजी घेत दोन्ही पक्ष एकमेकांवर दबाव कायम ठेवताना दिसत आहेत.