सातारा : बहुजननामा ऑनलाइन – पारंपारिक व्यवसायाबरोबरच शिक्षण, क्रीडा व साहित्य क्षेत्रातील धनगर समाजाची कामगीरी ही उल्लेखनीय असून या समाजाने साहित्याच्या माध्यमातून समाजामध्ये जागृती निर्माण करण्याचे काम करावे असे आवाहन माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी केले.म्हसवड, जि.सातारा येथे धनगर साहित्य परिषदेच्या वतीने तिसरे आदिवासी धनगर साहित्य संमेलन पार पडले.
या संमेलनाच्या समारोप प्रसंगी मोहिते-पाटील यांनी आपले विचार मांडले. अध्यक्षस्थानी आ गणपतराव देशमुख हे होते. मोहिते-पाटील म्हणाले, धनगर समाज हा पशुपालक समाज आहे. वर्षातील आठ महिने हा समाज मेंढपाळ करण्यासाठी भटकंती करतो. त्यामुळे शिक्षणापासून तसा तो वंचीत आहे. हा समाज कष्टाळू व प्रामाणिक आहे.
या सामाजाला योग्य दिशा देण्याचे काम गेली तीन वर्षे साहित्य संमेलनाच्या माध्यमातून होत आहे ही अभिमानाची बाब आहे, असे सांगून धनगर समाजातील वैद्यकीय, शिक्षण व क्रीडा क्षेत्रातील कामगिरीबद्दल त्यांनी त्यांचे कौतुक केले.