नांदेड : बहुजननामा ऑनलाईन – मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली लागल्यानंतर आता धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी जोर धरू लागली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील बऱ्याचदा आपल्या भाषणांमधून धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले आहे. आता राज्याच्या ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी देखील धनगर समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मंत्रालयाच्या दालनात प्रवेश करणार नाही असं जाहीर वचन धनगर समाजाला दिले आहे. नांदेड जिल्ह्यातील माळेगाव इथल्या खंडोबाच्या यात्रेत आयोजित धनगर आरक्षण जागर परिषदेत त्या बोलत होत्या.
यावेळी बोलताना त्या म्हणाल्या “मी पंकजा गोपीनाथ मुंडे तुम्हाला वचन देते की, तुमच्या आरक्षणाचा विषय होईपर्यंत मंत्रालयाच्या दालनात प्रवेश करणार नाही. आम्ही पुन्हा सत्ता काबीज करणार आहोत. पण धनगर आरक्षण मिळाल्याशिवाय परत मंत्रालयात प्रवेश करु शकत नाही, याचा विश्वास आहे, असं पंकजा म्हणाल्या. धनगर आरक्षणाच्या निर्णायाशिवाय पुन्हा भाजपाची सत्ता येणार नसल्याचंही पंकजा यांनी जाहीरपणे कबुल केलं. या परिषदेला रासपचे प्रमुख महादेव जानकरही उपस्थित होते.
धनगर आरक्षणासाठी दिल्लीच नव्हे तर पृथ्वीच्या बाहेर जाण्याची, तुमच्यासोबत मेंढरामागे येण्याची तयारी असल्याचा विश्वास पंकजा मुंडे यांनी धनगर समाजाला दिला. “धनगर आरक्षणात कोणी आडकाढी आणली तर ही काढी उगारायला मागे-पुढे बघणार नाही,” असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.