पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेल्या धम्माच्या त्रिशरण, पंचशीलामध्ये मानवाला सतप्रवृत्तीकडे नेण्याचे सामर्थ्य आहे. हिंसेला विरोध करणाऱ्या बौद्ध धम्मातील त्रिशरण, पंचशील व 22 प्रतिज्ञांचा प्रत्येक मनुष्याने आयुष्यात स्वीकार केल्यास मानवी मनातील राग, लोभ, मोह, माया, मत्सर, द्वेष या पराकोटीच्या असामाजिक तत्वांपासून दूर राहता येणे शक्य होते. व्यक्ती-व्यक्तींमधील संबंध व बौद्धीक पात्रता सुधारण्यास पंचशील हातभार लावते. असे मत भन्ते विमलकीत्ती गुणसिरी यांनी व्यक्त केले.
रविवारी आकुर्डी प्राधिकरणातील तक्षशिला बुद्धविहारात आयोजित केलेल्या प्राज्ञजन परिषद आणि धम्म दीक्षा संस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. त्यावेळी त्यांची धम्मदेसना झाली.
ते म्हणाले की, जगण्यासाठी मानवाचे मानसिक व शारिरीक आरोग्य उत्तम असणे आवश्यक आहे. बौद्ध धम्माच्या त्रिशरण, पंचशीलामध्ये मानवाला सतप्रवृत्तीकडे नेण्याचे सामर्थ्य आहे. त्यामुळे मानवाला जीवनात निरोगी, संस्कारी व उत्तम जीवन जगण्याची संधी मिळते, या परिषदेमध्ये स्थानिक पातळीवरील विद्वान, सुसंस्कारित व्यक्तींचा समावेश असल्याने त्यांच्या माध्यमातून परिसरातील वातावरण शांततामय व आप-आपसातील संबंध सौहार्दपूर्ण ठेवण्यासाठी वापर केला जाऊ शकतो. त्यादृष्टीने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
या सोहळ्यात धम्मदिक्षा स्वीकारलेल्या 460 उपासक-उपासिकांना संस्थेच्या वतीने प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यावेळी भन्ते विमल आनंद, भन्ते विमल कीर्ती, सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी पंजाबराव देशमुख, डॉ. पंचशीला दुर्गे, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सेवानिवृत्त सहशहर अभियंता रवींद्र दुधेकर, शरद जाधव, वसंत साळवी, संस्थेचे अध्यक्ष प्रताप सोनवणे, सचिव दत्तात्रय मिसाळ, आदर्श समाज विकास संघाचे नामदेव वाळके, काळेवाडी येथील तक्षशिला बुद्ध विहाराच्या रोहिणी लादे, डॉ. दिनेश जाधव, हिरामण रामटेके व बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दत्तात्रय मिसाळ यांनी प्रास्ताविक केले. हिरामण रामटेके यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी “धम्म आपल्या दारी’ आणि तक्षशिला मित्र संघाच्या पदाधिखाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.