जळगाव : बहुजननामा ऑनलाइन – भाजपाचे सर्व मुद्दे फेल ठरून जनतेचा त्यांच्याविरुद्ध विश्वास उडाल्याने जनता विरुद्ध राहुल गांधी असे चित्र उभे करण्याचा प्रयत्न ते करीत आहेत, परंतु ही लढाई तशी नसून मोदी विरुद्ध संविधान अशीच ही लढाई असल्याची भावना राष्ट्रवादीचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ यांनी व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात प्रतिसाद मिळत असल्याचा विश्वास अमळनेर भेटीप्रसंगी व्यक्त केला.
चोपडा येथील निर्धारसभा आटोपून नाशिक जात असताना राष्ट्रवादीचे नेते अनिल भाईदास पाटील यांच्या निवासस्थानी त्यांनी सदिच्छा भेट दिली. सुरवातीला चोपडा नाका व यानंतर विश्रामगृहजवळ राष्ट्रवादीसह समता परिषद व माळी समाजाच्या कार्यकर्त्यानी त्यांचे स्वागत केले. यानंतर अनिल पाटील यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला, ते म्हणाले की, जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या निर्धार सभा सुरु असून सर्वत्र प्रचंड असा प्रतिसाद मिळत आहे,अच्छे दिनच्या नावाखाली जनतेची फसवणूक झाल्याने जनतेचा भाजपा व पंतप्रधान मोदीवरील विश्वास आता उडाला आहे, याचाच प्रत्यय पाच राज्याच्या निवडणुकीत दिसून आला. त्यांच्या राज्यात असंवेदनशीलता वाढली असून अनेकांच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली जात आहे, विकास हा मुद्दा बाजूला ठेऊन मनुवाद पसरविला जात आहे, त्यांनी राम मंदिर सारखे भावनिक मुद्दे पुढे करून निवडणूका लढविल्या परंतु शरद पवार यांनी कधीही असे मुद्दे न घेता शेतकऱ्यांचे व जनतेच्या प्रश्नांवर निवडणूका लढविल्या आहेत.
यांच्या राज्यात पेट्रोल डिझल यासह सर्वच महागले असून राफेल घोटाळा सर्वज्ञात आहे, सर्वाना आरक्षणाचे गाजर दाखविले जात आहे. मात्र या सरकारकडे नोकऱ्याच नाहीत, देशाचे संविधान देखील यांना मान्य नसून राज्यसभेत बहुमत असते तर आम्ही घटना बदलवली असती असे यांच्या नेत्यांनी अनेकदा बोलून दाखविले आहे. यामुळे अश्या संविधान विरोधी सरकारच्या विरोधात ही खरी लढाई असल्याचे त्यानी स्पष्ट केले. लवकरच जळगाव लोकसभेसाठी राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवारांचे नाव घोषित केले जाईल असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, भुजबळ यांनी वेळ काढून अमळनेर येथे अनिल पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिल्याने अनिल पाटील यांचे राजकीय प्राबल्य वाढून लोकसभेसाठी तेच राष्ट्रवादीचे उमेदवार असतील असे स्पष्ट होत आहे. मतदार संघात झालेल्या निर्धार सभांमध्येही अनिल पाटील यांनी मंचावर स्थान देऊन एकप्रकारे प्रोत्साहित केले जात आहे, तसेच सर्व वरिष्ठ नेते देखील त्यांच्या संपर्कात असल्याने लोकसभेचे उमेदवार म्हणून त्यांचे वलय निर्माण होत आहे. भुजबळ यांचे अनिल पाटील यांच्या निवासस्थानी जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी अनिल पाटीलांसह जिल्हा बँक संचालिका तिलोत्तमा पाटील, तालुकाध्यक्ष सचिन बाळू पाटील, शहराध्यक्ष मुक्तार खाटीक, शिवाजीराव पाटील, भागवत पाटील, विनोद कदम, संजय भिला पाटील, सुनिल शिंपी, संजय महाजन, यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.