नाशिक : बहुजननामा ऑनलाईन – बौद्ध समाजातील विचारवंत विचाराने पुरोगामी आहेत, तर आचरणाने मात्र प्रतिगामी असल्यासारखे वागतात. धम्म म्हणजे जीवन जगण्याची कला आहे. मध्यम मार्ग आहे, असे प्रतिपादन पाली भाषा अभ्यासक व बौद्ध साहित्यिक नंदकिशोर साळवे यांनी केले. शुभलक्ष्मी मंगल कार्यालयात ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची धम्म चळवळ गतिमान कशी होईल’ या विषयावर आयोजित व्याख्यानात साळवे बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक सुधाकर बडगुजर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन गोरख बागूल यांनी केले होते.
साळवे म्हणाले, धम्म म्हणजे मध्यम मार्ग स्वीकारणे, मिळालेल्या उत्पन्नात समाधानी राहणे, विवेक, विज्ञान, बुद्धिप्रामाण्य, तर्कसंगत मार्ग अंगीकारणे होय. याकरिता धम्म समजून घेणे आवश्यक आहे. १९५६ साली डॉ. आंबेडकरांनी धम्माची दीक्षा घेतली. आंबेडकरी धम्म अद्याप लोकांपर्यंत पोहोचू शकला नाही, ही शोकांतिका आहे. धम्म म्हणजे नीती आणि नीती म्हणजे धम्म होय. पारंपरिक धम्म व आंबेडकरी धम्म यात खूप फरक आहे. बाबासाहेबांनी धम्माची शिकवण म्हणून २१ प्रतिज्ञा दिल्या. त्याचे आचरण झाले पाहिजे. नेमक्या त्याच पाळल्या जात नसल्याची शोकांतिका आहे. त्यामुळेच त्यानंतर धम्म चळवळ गतिमान झाली नाही.
१९५६ नंतर बाबासाहेबांसारखे मार्गदर्शक समाजाला मिळाले नाहीत. बौद्ध समाजातील विचारवंत विचाराने पुरोगामी आहेत, आचरणाने मात्र प्रतिगामी असल्यासारखे वागतात. छुप्या पद्धतीने ही मंडळी कर्मकांड करतात. देव धर्म पळतात. प्रत्यक्षात सत्यनारायण पूजन, जेजुरीचा खंडोबा, म्हसोबाच्या दर्शनाला जातात. यामुळेच आंबेडकरी चळवळीला गती मिळाली नाही. धम्म गतिमान करण्यासाठी धम्माची शिकवण देणारी शाळा सुरू केली पाहिजे. यात शालेय शिक्षणाबरोबरच धम्माची शिकवण दिली पाहिजे. बौद्ध भिक्खू व उपासक यांच्यात समन्वय साधला पाहिजे. पारंपरिक धम्मामध्ये ठेवलेला विचार बाजूला ठेवून आंबेडकरी धम्म पाळण्याचे आवाहन त्यांन्ी केले. या प्रसंगी कल्पना बागूल, कुणाल बागूल, प्रशांत बागूल, दिलीप बागूल, विक्रम बागूल आदींसह मोठ्या संख्येने उपासक उपस्थित होते.