नाशिक : बहुजननामा ऑनलाईन – उच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर महापालिकेने जारी केलेल्या धार्मिक स्थळांसंदर्भातील अधिसूचनेवर हरकत नोंदविण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. धार्मिक स्थळांच्या विश्वस्तांनी महापालिकेकडे हरकत नोंदविण्याचे आवाहन धार्मिक स्थळ बचाव समितीचे समन्वयक तथा सभागृहनेते दिनकर पाटील यांनी केले आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर महापालिकेने धार्मिक स्थळांचे फेरसर्वेक्षण करत ८९९ पैकी ६४७ धार्मिक स्थळं अनधिकृत ठरविली आहेत. त्यामुळे शहरातील धार्मिक स्थळांचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विकास नियंत्रण नियमावलीतील तरतुदीचा आधार घेत महापालिकेच्या मोकळ्या भूखंडांवरील धार्मिक स्थळे नियमित करण्याचा ठराव महासभेने संमत केला आहे.
यासंदर्भातील प्रस्ताव शासनाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आला होता; परंतु सत्तारूढ भाजप-सेनेच्या आमदारांनी या प्रस्तावाच्या मान्यतेसाठी शासनाकडे कुठलाही पाठपुरावा न केल्यामुळेच धार्मिक स्थळांवर कारवाईचे अरिष्ट कोसळल्याचा आरोप धार्मिक स्थळांच्या विश्वस्तांकडून करण्यात आला होता. यासंदर्भात गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात धार्मिक स्थळांच्या विश्वस्तांची बैठक झाल्यानंतर भाजप शहराध्यक्ष तथा आमदार बाळासाहेब सानप यांच्या पंचवटीतील कार्यालयासमोर धार्मिक स्थळ बचाव समितीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. मात्र त्यानंतरही धार्मिक स्थळ बचावासाठी मुख्यमंत्र्यांच्या भेटीचे आश्वासन पूर्ण होऊ शकलेले नाही. त्यामुळे महापालिकेकडे रितसर हरकत नोंदविण्यापलिकेडे धार्मिक स्थळांच्या विश्वस्तांच्या हाती आता काहीही उरलेले नाही. त्यामुळे विहित कालावधीत पालिकेकडे हरकत नोंदविण्याचे आवाहन सभागृहनेेते दिनकर पाटील यांच्यासह धार्मिक स्थळ बचाव समितीचे विनोद थोरात, कैलास देशमुख, नंदू कहार, चंदन भास्करे, प्रविण जाधव यांनी केले आहे.