लातूर : बहुजननामा ऑनलाईन – देशातील आदिवासींचे अधिकार कमी करून त्यांचे नागरिकत्वच अडचणीत आणण्याचा डाव घातला जात आहे. मना-मनात द्वेष निर्माण करून समाजाचे विभाजन करण्यात येत आहे. भांडवली देशांच्या हातचे बाहुले झालेला आपला देश आता सर्वसामान्यांना दिलेले अधिकारच गोठविण्याचे षडयंत्र आखत असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. गणेश देवी यांनी व्यक्त केले.
दयानंद सभागृहात संविधान गौरव परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. देवी बोलत होते. डॉ. नागोराव कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या परिषदेस धनाजी गुरव, ॲड. शिवाजी जवळगेकर, ॲड. मनोहर गोमारे, परिषदेचे आयोजक सुधीर अनवले आदींची उपस्थिती होती. यावेळी गारुडी समाजाच्या वतीने डॉ. देवी यांचा गळ्यात साप घालून सत्कार करण्यात आला. यावेळी भटक्या विमुक्त समाजातील वैदु, गारुडी, जोशी आदी विविध जातींच्या नागरिकांनी पारंपारिक वेशभूषेत उपस्थिती लावली होती.
यावेळी बोलताना डॉ. देवी म्हणाले की, सध्या जगभर तिरस्काराचे वातावरण असून भटक्या विमुक्त समाजाच्या लोकांना संविधानाने दिलेले अधिकार संपविण्याचे काम सुरू आहे. समतेवर आधारित देशाचे संविधान बदलण्याचा डाव आपण वेळीच हाणून पाडला पाहिजे. केवळ भटके विमुक्तच नाही तर सर्वच वंचितांचे अधिकार डावलण्याचे षडयंत्र सुरू असून संविधानच अडचणीत आल्याची भीती डॉ. देवी यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी बोलताना धनाजी गुरव म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एकत्र येऊन जेव्हा सांगतात की, लोकशाही धोक्यात आहे तेव्हा आपण भविष्यातील धोके ओळखावेत. प्रा. सुधीर अनवले यांनी परिषदेच्या आयोजनामागची भूमिका प्रास्ताविकातून मांडली तर प्रा. डॉ. शिवाजी जवळगेकर, ॲड. मनोहर गोमारे यांची भाषणे झाली.