औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाईन – समाजकल्याण विभागातर्फे चालविण्यात येणाऱ्या विद्यार्थी वसतिगृहांच्या समस्या सोडविण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) तर्फे आयुक्तांना घेराव घालण्यात आला. येत्या चार दिवसात समस्या न सोडविल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचेही पदाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले.
समाजकल्याण विभागाच्या विद्यार्थी वसतिगृहात विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. शासन निर्णयानुसार विद्यार्थ्यांना सुविधा देण्यात येत नाहीत. वॉर्डन चुकीच्या पद्धतीने बिले काढत आहेत. हडको भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात तर अधिकच बिकट स्थिती आहे. विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. स्वच्छतागृहाच्या वापरासाठी पाणीटंचाई आहे. वसतिगृहाची इमारत मोडकळीस आली असून विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. यासह अन्य समस्या तत्काळ सोडवण्यात याव्यात, या मागणीसाठी समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त एस. एस. शेळके यांना घेराव घातला. तर विभागीय उपायुक्त बच्छाव यांना मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी अभाविप महाराष्ट्र प्रदेश वसतिगृह प्रमुख रामेश्वर काळे, महानगर मंत्री शिवा देखणे, निखिल आठवले, महेंद्र मुंडे, देवानंद इंगोले, विशाल उगले, यश आसुडे, मयूर वाघमारे, शिवनाथ अठोळे, एजाज शहा यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.