मुंबई – पोलीसनामा ऑनलाइन – देशात वन नेशन वन इलेक्शन वरुन चर्चा सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विषयावर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलविली होती. या पद्धतीला काँग्रेस पक्षाचा सुरुवातीपासूनच विरोध होता. मात्र पक्षापेक्षा वेगळी भुमिका घेत मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी वन नेशन वन इलेक्शनचं समर्थन केलं आहे.
देवरा यांनी पत्र लिहून एक देश एक निवडणूक पद्धतीचे समर्थन केले आहे. त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या या प्रस्तावावर चर्चा करणं योग्य आहे. या प्रस्तावावर सहमती बनविण्यासाठी सरकारला प्रयत्न करावेच लागतील. देशात सातत्याने निवडणुका होणं हे चांगल्या प्रशासनासाठी आणि गंभीर समस्या दूर करण्यासाठी बाधित आहे. चांगल्या प्रशासनाला लोकांच्या समस्या दूर करण्यासाठी दीर्घकालीन समाधान शोधावं लागेल. आपल्याला कोणत्याही परिस्थिती लोकशाही मजबूत करण्यासाठी तयार राहावं लागेल. 1967 सालीही देशात अशाप्रकारे निवडणूक झाली होती हे आपल्याला विसरता येणार नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप पक्षाचा एक देश एक निवडणुक तत्वावर विश्वास आहे. तर ही पद्धत अमलात आल्याने केंद्रात सत्तेत असलेल्या पक्षाला फायदा होईल, असा विरोधकांचा आक्षेप आहे. काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांनी मोदी सरकार मुख्य प्रश्नांवरुन लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठीच एक देश एक निवडणूक हा मुद्दा समोर आणला असल्याचा आरोप देखील केला आहे.