अमरावती : बहुजननामा ऑनलाइन – सध्याच्या परिस्थितीत काँग्रेस -राष्ट्रवादीला आमची गरज आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस बरोबर आम्ही चर्चा करायला तयार आहोत. त्यांना १२ जागांचा प्रस्ताव दिला आहे. आणि चर्चा करायची असेल तर लगेच करा, आम्ही वाट पाहणार नाही. असे भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटले आहे.
अमरावतीच्या सायन्सकोर मैदानात रविवारी वंचित बहुजन आघाडी महासंघाची जाहीर सभा पार पडली. दरम्यान लोकसभा निवडणुकीसाठी ज्या मतदारसंघात काँग्रेसकडे उमेदवार नाहीत, त्या मतदारसंघांमध्ये आम्ही उमेदवार उभे करु. लोकसभा निवडणुकीसाठी अनेक ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादीकडे उमेदवार नाहीत. सध्याच्या परिस्थितीत काँग्रेस-राष्ट्रवादीला आमची गरज आहे. आम्ही काँग्रेसला १२ जागांचा प्रस्ताव दिला आहे, मात्र आम्ही त्यांच्या भरवशावर नाही, असे भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे.
विशेष म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकीतील वंचित बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराची घोषणाही प्रकाश आंबेडकरांनी यावेळी केली. गुणवंत देवपारेंना लोकसभा निवडणुकीसाठी अमरावती मतदार संघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. एमआयएमचे आमदार वारीस पठाणही यावेळी उपस्थित होते.
विदर्भातील संत्र्यांना शरद पवारांनी केले शापित
या सभेत आंबेडकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला. विदर्भातील संत्र्याला शरद पवारांनीच शापित केले असल्याचा आरोप आबंडेकरांनी यावेळी केला. विदर्भातील संत्र्याच्या बियांमध्ये अॅसिड असते असे सांगितल्यानेच आज विदर्भातील संत्र्याला योग्य बाजारभाव मिळत नाही. यासाठी शरद पवारच जवाबदार असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला.