नागपूर : बहुजननामा ऑनलाइन – भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यामुळे मध्य प्रदेश, राजस्थान पाठोपाठ महाराष्ट्रातही ‘ऑपरेशन कमळ’ची राजकीय चर्चा रंगली. मात्र फडणवीस यांनीच ही शक्यता फेटाळून लावली आहे. तर काँग्रेसचे नेते आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी फडणविसांना राज्यात शेवटी कटोरं घेऊन फिरावं लागले, अशी सडकून टीका केला आहे.
नागपूर शहर आणि ग्रामिणच्या कायदा सुव्यवस्था आणि कोरोनाच्या संदर्भातील कायदा व सुव्यवस्थेच्या संदर्भात उच्चस्तरीय आढावा बैठक आज घेण्यात आली. या बैठकीला राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत हजर होते. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना नितीन राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
महाराष्ट्र सरकार चांगल्या स्थितीत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे चांगलं काम करत आहेत. आमचे आमदार खुश आहेत. यामुळे हे सरकार पाच वर्षे चालणार आहे. शेवटी देवेंद्र फडणवीस यांना कटोरा घेऊन फिरावं लागेल, अशी टीका राऊत यांनी केली. तसेच राजस्थानमध्ये काँग्रेसचं सरकार पाडण्यासाठी गेल्या आठवड्याभरापासून प्रयत्न सुरु होता. भाजपनं आमदार विकत घेऊन सरकार पाडण्याचं षडयंत्र रचलं होतं, पण त्यात त्यांना यश आलं नाही, असेही भाष्य राऊत यांनी केलं.