बहुजननामा ऑनलाईन – पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्याकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील हे तिकीट मागत असल्याचा गौप्यस्फोट जानकराणी केला आहे.तर आता हर्षवर्धन पाटील भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चाना जोर आला आहे. आता हर्षवर्धन पाटील कोणत्या पक्षातून यंदाची विधानसभा निवडणूक लढणार आहे याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत वेगवेगळे लढत होते. हर्षवर्धन पाटील यांचा इंदापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराकडून पराभव झाला होता. अलीकडेच हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली होती. यामुळे पाटील भाजप प्रवेश करणार का अशा चर्चाना उधाण आली होती.
धनगर समाजाचे आरक्षण हे केंद्र सरकारच्या अखत्यारित येत असल्यामुळे राज्य सरकारला याची घोषणा करता येणार नाही. परंतु राज्य सरकार धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत सकारात्मक आहे. धनगर समाजाने संयम बाळगावे कारण या प्रक्रियेला थोडा वेळ लागणार आहे. असे आवाहन महादेव जानकर यांनी केले.महादेव जानकर यांनी इंदापूर येथे चार छावण्यांना भेट देऊन पाहणी केली.यावेळी ते बोलत होते, धनगर समाजाला सरकारने एक हजार कोटी रुपयांच्या निधीसह विविध योजना लागू केल्या आहेत. सारथी ही संस्था दलित, आदिवासी, बारटी , शबरी आणि मराठा समाजासाठी काम करते, त्याचप्रमाणे भटक्या – विमुक्तांना आणि ओबीसी समाजाला आर्थिक स्थैर्य देण्यासाठी महाज्योती या संस्थेची निर्मिती केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून भटके विमुक्त आणि ओबीसींना आर्थिक सक्षम करत असल्याचेही जानकरांनी सांगितले.
सध्या भारतीय जनता पक्षात मोठ्या प्रमाणात भरती सुरु आहे. भाजप आणि शिवसेनेचे भांडण मिटल्यानंतर युतीमधील घटकपक्षांना राहिलेल्या जागा मागणार आहोत. यात रासपने ५२ जागांची मागणी केली असून त्यामध्ये दौंड आणि इंदापूरची जागा प्रामुख्याने मागितली असल्याचेही जानकरांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी पशुसंवर्धन मंत्री म्हणून , जोपर्यंत चाऱ्याची उपलब्धता होत नाही तो तोपर्यंत चार छावण्या बंद करणार नाही असा निर्णय घेतला आहे. आता जरी पाऊस पडत असला तरी चारा निर्माण होण्यासाठी दोन ते तीन महिने लागणार आहेत. म्हणूनच ही अडचण समजून आम्ही चारा छावण्यांना दोन ते तीन महिने जास्तीचा कालावधी दिला आहे. असे जानकरांनी सांगितले.