पिंपरी बहुजननामा – भाजप आणि शिवसेनेची महाजनादेश आणि जनआशिर्वाद यात्रा या केवळ मुख्यमंत्रीपदासाठी आहेत. परंतु राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा ही रयतेचा आवाज बुलंद करणारी आहे. त्यामुळे शिवस्वराज्य यात्रेशी दोन्ही यात्रांची तुलनाच होऊ शकत नाही. आणि ती करू नका अशी टोलेबाजी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली.
पिंपरी चिंचवडमध्ये गुरुवारी भोसरी विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर डॉ. अमोल कोल्हे बोलत होते.
मुख्यमंत्र्याच्या यात्रेवर बोलताना ते म्हणाले, राज्याला पुर्णवेळ गृहमंत्री नाही. त्यामुळेच राज्यातील गुन्हेगारी फोफावत आहे. मुख्यमंत्र्याच्या नागपूरातही गुंडगिरी बोकाळली आहे. लोकांचा आवाज सत्ताधाऱ्यांना ऐकू येत नाही. हे सत्तेचा माज असल्याचे प्रतिक आहे. असा घणाघात त्यानी मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या गृहमंत्री पदाबाबत केला. तर पक्षांतरावरही त्यांनी मत व्यक्त केले. पक्षातील नेते गेले असले तरी पक्षातील इमारतीच्या तळावरील वीट म्हणजेच कार्यकर्ते अजूनही कायम असल्याने ती मजबूत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी ही परिवर्तनाच्या टप्प्यावर आहे. असे ते म्हणाले.