मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – राज्यात एकीकडे ओल्या दुष्काळामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. तर दुसरीकडे भाजप-शिवसेनेतील सत्ता स्थापनेविषयीचा गुंता वाढतच चालल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावर चिंता दिसून आली. परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली असून यासंदर्भात ठोस पावले उचलणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत त्यांनी राज्यातील परिस्थितीविषयी नाराजी व्यक्त केली.
राज्यातील परतीच्या पावसामुळे शेकऱ्यांच्या झालेल्या नुकसानावरील उपाययोजनांसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली तातडीने बैठक झाली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या मदतीबाबत सूचना दिल्या. परंतु या बैठकीत सत्ता स्थापनेवरून भाजप-शिवसेनेत वाढलेला तणाव त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोला जिल्ह्यातील परतीच्या पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांशी त्यांनी चर्चा देखील केली. यानंतर यावर उपापययोजनांसाठी तातडीने अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. ६ नोव्हेंबरपर्यंत पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. विमा नसलेल्या शेतकऱ्यांनाही मदत देण्याचा प्रयत्न आहे. यासाठी सरकारी आणि खासगी विमा कंपन्यांशी सरकारची चर्चा सुरू आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.