बहुजननामा ऑनलाईन टीम – केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि राज्य सरकारमधील संघर्ष अद्यापही सुरु आहे. गोयल यांनी पुन्हा एकदा ट्विट करत महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र सरकारकडून आतापर्यंत 145 पैकी 85 ट्रेन सुटणे अपेक्षित होते. पण राज्य सरकारकडून प्रवाशांची व्यवस्था करण्यात न आल्याने फक्त 27 ट्रेनच सुटू शकल्या असे ट्विट पीयूष गोयल यांनी केले आहे. महाराष्ट्र सरकारला माझी पुन्हा एकदा विनंती आहे की, गरीब मजुरांना आपल्या घरी जाण्यासाठी मदत करावी असे ते म्हणाले.
महाराष्ट्राने 145 ट्रेन मागितल्यानंतर आम्ही रात्रभर आढावा घेतला. यानंतर योजना तयार करुन ट्रेन पोहोचवल्या. महाराष्ट्रात 145 ट्रेन उभ्या असून त्यांच्यासाठी प्रवासीच नाहीत. महाराष्ट्र सरकार प्रवासी आणण्यात अपयशी ठरत आहे. त्यांची व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. महाराष्ट्र सरकारने जेवढ्या ट्रेन मागितल्या तेवढ्या आम्ही दिल्या. पण प्रवासीच नसल्याने विनाप्रवासी ट्रेन पुन्हा परतत आहेत. महाराष्ट्र सरकारने प्रवासी मजुरांच्या अडचणीचे राजकारण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पीयूष गोयल यांनी केला आहे. दुर्भाग्य आहे की अनेक ट्रेन मोकळ्या आहेत, अन्यथा लाखो लोक आज आपल्या घरी पोहोचले असते असेही पीयूष गोयल यांनी म्हटले आहे.