नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरस महामारीदरम्यान कंपन्यांनी आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये आपल्या कर्मचार्यांना सरासरी 3.6 टक्केची वेतनवाढ दिली आहे. मागच्या आर्थिक वर्षात सरासरी 8.6 टक्के सॅलरी वाढवण्यात आली होती. प्रमुख सल्लागार कंपनी डेलॉयट टच तोहमात्सु इंडिया एलएलपीच्या एका सर्वेमध्ये हे तथ्य समोर आले आहे. सर्वेनुसार चालू आर्थिक वर्षात कर्मचार्यांच्या वेतनवाढीत दोन गोष्टी वेळ आणि कोविड-19 यांनी सर्वात महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे.
सोमवारी जारी या सर्वेमध्ये म्हटले आहे की, ज्या संस्थांनी मार्च 2020 मध्ये लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी वेतनवाढीबाबत निर्णय घेतला होता, त्यांनी अन्य कंपन्यांच्या तुलनेत आपल्या कर्मचार्यांना जास्त वेतनवाढ दिली आहे. तर मोठ्या संख्येत कंपन्यांचे म्हणणे आहे की, कोविड-19 मुळे 2020-21 मध्ये त्यांच्या उत्पन्नात 20 टक्केपेक्षा जास्त घसरण येईल. अशा कंपन्यांनी आपल्या कर्मचार्यांना खुपच कमी वेतनवाढ दिली आहे.
कोविड-19 चा संसर्ग रोखण्यासाठी 25 मार्चला देशात राष्ट्रव्यापी बंद लागू करण्यात आला होता. मेच्या अखेर प्रतिबंधामध्ये शिथिलता आणली गेली. परंतु, कोरोना हायरसच्या वाढत्या प्रकरणांमुळे काही राज्यांमध्ये नियंत्रण मिळवणे सुरूच आहे. यामुळे आर्थिक हालचालींवर खुप वाईट परिणाम झाला आहे. 2020 च्या दुसर्या टप्प्यात मनुष्यबळ आणि वेतनवाढ सर्वे जून, 2020 मध्ये सुरू करण्यात आला. यामध्ये 350 कंपन्यांनी भाग घेतला.
सर्वेनुसार 10 पैकी केवळ 4 कंपन्यांनी 2020 मध्ये कर्मचार्यांना वेतनवाढ दिली आहे. 33 टक्के कंपन्यांनी कर्मचार्यांना कोणतीही वेतनवाढ न देण्याचा निर्णय घेतला आहे. तर अन्य कंपन्यांनी अजूनही यावर निर्णय केलेला नाही. या हिशेबाने 2020मध्ये सरासरी वेतनवाढ 3.6 टक्के होते, जी मागच्या वर्षीच्या निम्म्यापेक्षा कमी आहे. मागच्या वर्षी कंपन्यांनी आपल्या कर्मचार्यांना 8.6 टक्के वेतनवाढ दिली होती.
सर्वेत म्हटले आहे की, वेतनवाढीचा हा आकडा दशकातील सर्वात कमी आहे. डेलॉयटने म्हटले आहे की, जर सर्वेत केवळ त्या संस्थांना घेतले गेले, ज्यांनी आपल्या कर्मचार्यांना वेतनवाढ दिली आहे, तर सरासरी वेतनवाढ 7.5 टक्के बसते. चालू आर्थिक वर्षात अशा कंपन्यांची संख्या 10 टक्क्यांपेक्षा सुद्धा कमी आहे, ज्यांनी आपल्या कर्मचार्यांना 10 टक्केपेक्षा जास्त वेतनवाढ दिली आहे.