लातूर : बहुजननामा ऑनलाईन – भाजपच्या ताब्यात असलेल्या लातूर महापालिकेने मतांच्या राजकारणासाठी ग्रेन मार्केट परिसरात मागील ४० वर्षांपासून असलेल्या बुद्धविहारावर बुल्डोजर चालवून तेथे शादीखाना उभारण्याचा राजकिय घाट घातला आहे. शादीखान्यासाठी दुसरी जागा आरक्षित असताना बुद्धविहाराच्या जागेवर शादीखाना उभारून मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांना मुस्लीम व बौद्ध समाजात दंगल घडवायची आहे. बुद्धविहाराची जागा बौद्धांच्या ताब्यात नाही दिली तर संपुर्ण राज्यभरात आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा भन्ते पय्यानंद यांनी दिला आहे.
लातूर शहरातील ग्रेन मार्केट परिसरात गेल्या जाळीस वर्षांपासून बुध्दविहार अस्तित्वात आहे. शहरातील बौध्द बांधव नियमितपणे येथे भेट देतात आणि कार्यक्रम घेत असतात. या जागेवर भव्यदिव्य बुध्द विहार बांधण्याचा समाजाचा मानस आहे. परंतु महापालिकेवर भाजपची सत्ता आल्यानंतर मंत्री संभाजी पाटील यांची नजर या बुद्धविहारावर पडली. त्यांनी बुद्धविहार उध्वस्त करून तेथे मुस्लीम समाजासाठी शादीखाना बांधण्याचे आदेश महापालिकेला दिले. त्यानुसार लातूर महापालिकेने बुद्धगया बुद्ध विहार पाडून त्या जागी शादीखाना बांधण्याचा ठराव स्थायी समितीत मंजूर करण्यात आला. त्यानंतर लातूर महापालिकेने सोमवारी या बुद्धविहारावर बुल्डोजर चालवला.
मुळात कॉंग्रेसच्या काळात मुस्लीम समजासाठी शादीखाना बांधण्यासाठी लाल गोडावून परिसरातील जागा तत्कालीन नगरपालिकेने निश्चित केली होती. नगरपालिकेने तसा ठराव मंजूर करून त्या जागेवर आरक्षण टाकले होते. आमदार अमित विलासराव देशमुख यांनी शादीखाना बांधकामाचे भूमीपुजनही केले होते. तरीही शादीखान्यासाठी बुद्धविहारावर बुल्डोजर चालविण्यात आला.
बोद्ध समाजाची मते आपल्याला मिळाली नाहीत त्यामुळे त्यांनी तो बुद्धविहार पाडून त्याजागी शादीखाना तयार करून तेथे मुस्लीमांची मते आपल्याला मिळावित असे त्यांना वाटते, याच कुटील हेतून संभाजी पाटील निलंगेकर यांनी हा कुटील डाव रचला आहे. मुस्लीम आणि बौध्द समाजात दंगली घडविण्याचा डाव त्यांचा आहे.
बौध्दांवर अन्याय करून मुस्लीम समाजाला चुचकारण्याचे धोरण म्हणजेच भाजपचे सब का साथ, सब का विकास हे आहे का? असा सवाल उपस्थित करत बुद्धविहाराची जागा तात्काळ बौद्धांच्या ताब्यात दिली नाही तर राज्यभर आंदोलन करू असा इशारा भंते पय्यानंद यांनी दिला आहे.