मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मराठा आरक्षणाबाबत न्यायालयाकडून सकारात्मक निर्णय होईल. त्यासाठी युती सरकार सक्षम असून समाजातील दुर्लक्षित घटकाला न्याय मिळेल. विरोधकांनी मराठा-धनगर आरक्षणाचे राजकारण करू नये, असा टोला राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते तथा दुग्धविकासमंत्री महादेव जानकर म्हंटले आहे.
याआधीच्या आघाडी सरकारने धनगर समाजाला न्याय दिला नाही मात्र सध्या सत्तेत असलेल्या युती सरकारने धनगर आरक्षणाबाबत ठोस पावले उचलली आहेत. न्यायालयातही प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. धनगर आरक्षणाची सुरुवात आम्हीच केली आणि समाजाचे भलेही आम्हीच करणार, असे राज्याचे दुग्धविकासमंत्री महादेव जानकर म्हणाले. धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिले होते. मात्र, चळवळीत बोलणे वेगळे आणि संसदीय कार्यपद्धती वेगळी असल्याची जाणीव सत्तेत आल्यानंतर झाली असल्याचे जानकर म्हणाले.
मराठा आरक्षणाप्रमाणे धनगर समाजाचे आरक्षण अडकून राहू नये यासाठी प्रयत्न करण्यात येतील. मात्र, सर्व अहवाल आल्यानंतर त्यावर निर्णय घेतला जाईल. याबाबत टिसच्या अहवालाचा आधार घेऊनच यावर विचार करू सरकारनेही न्यायालयात अनुकूल प्रतिज्ञापत्र सादर केले असून युती सरकारच धनगर समाजाला आरक्षण देणार असल्याचे जानकर म्हणाले तसेच यंदाच्या बजेटमध्ये धनगर समाजासाठी स्वतंत्र तरतूद केली असल्याचे जानकर यांनी म्हंटले आहे.